प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले. या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 20 फेबुवारीपर्यंत मुदत वाढवावी, अशी सूचना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी शाळा-महाविद्यालयांना केली आहे.
यंदाचे शैक्षणिक वर्षाला कोरोना महामारीमुळे विलंबाने प्रारंभ झाला. त्यानुसार शाळा-महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून पूर्ण प्रमाणात सुरू करण्यात आली आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून काही वर्ग पर्यायी मार्गाने घेतले जात आहेत. त्याचबरोबर राज्यातील विविध भागातील विद्यार्थी आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत.
यावषी प्रवेश घेण्यासाठी 6 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस होता. पण, बऱयाच विद्यार्थ्यांना अद्याप नावनोंदणी करता आलेली नाही. यावषी उशिरा वर्ग सुरू झाल्याने नाव नोंदणीसाठी वेळ वाढवून द्यावा, अशा मागणीचा प्रस्ताव राज्यातील विविध भागातील विद्यार्थी, पालक आणि जनप्रतिनिधींकडून देण्यात आला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या हितदृष्टीने प्रवेश प्रक्रियेसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत वाढ करावी, अशी सूचना सार्वजनिक शिक्षण विभाग आयुक्त व पदवीपूर्व विभागाच्या संचालकांना शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. सर्व वर्गांसाठी नोंदणी अनिवार्य असल्याने शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी विद्यार्थ्यांची नोंदणी सुलभ करण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षाचा कालावधी वाढविण्याची सूचना केली आहे.