ऑनलाईन टीम / मुंबई :
पदवी आणि पदव्युत्तरच्या फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता इतर वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आले आहेत, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली.
ते म्हणाले, यूजीसीने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै महिन्यात होणार आहेत. तसेच 15 ऑगस्ट पर्यंत यांचे निकाल लावले जातील.
बीए हा तीन वर्षांचा कोर्स असतो. त्यामध्ये एकूण सहा सेमीस्टर असतात. त्यातील फक्त सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेतली जाणार आहे. बीकॉमसाठी देखील तीन वर्षांचा कालावधी असतो. तिथे देखील अशा प्रकारेच परीक्षा घेतली जाणार आहेत फक्त जिथे 8 सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टरची, 10 सेमीस्टर असतील तिथे 10 व्या सेमीस्टरची परीक्षा घेतली जाईल, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, एम.ए, एमकॉम आणि इतर 2 वर्षांचे जे कोर्स आहेत, तिथे एकूण चार सेमीस्टर असतात. त्यामुळे त्यातील चौथ्या सेमीस्टरची परीक्षा होणार आहे.
डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. या कालावधीत सहा सेमिस्टर असतात. त्यामुळे सहाव्या सेमीस्टरची परीक्षा होईल. तसेच अंतिम वगळता अन्य वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्गात प्रवेश मिळणार आहे, असंही सामंत यांनी यावेळी सांगितले.