संत गोरोबाकाका साहित्यनगरी / संकेत कुलकर्णी
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची, चांगले शिक्षण द्यायचे सोडून सध्या विद्यार्थ्यांवर लाठय़ा-काठय़ा टाकण्याचे काम होत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना मारलं तर आम्ही शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांवर होणारी मारहाण कोणत्या संस्कृतीत बसते? असा रोखठोक सवाल 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी उपस्थित केला.
संत गोरोबाकाका साहित्यनगरी उस्मानाबादेत शाहीर अमर शेख मुख्य रंगमंचावर 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉक्टर अरुणा ढेरे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, नागनाथ कोतापल्ले, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष नितीन तावडे उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.
मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे सुपूर्त केली. याप्रसंगी संमेलनाच्या ‘पोत’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. तर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन संमेलनाच्या मंचावर झाले.
फादर दिब्रिटो पुढे म्हणाले, आमच्या प्रियतम भारतात विद्यार्थ्यांना मारण्याच्या घटना घडतात हे चुकीचे आहे. अनपेक्षितपणे संमेलनाचे अध्यक्ष झालो. त्यामुळे आपल्यावर टीकादेखील झाली. पण टीका करणारे माझेच बांधव आहेत. कारण या देशाची प्रतिज्ञा मी शिकलो आणि ती मानतो देखील. त्याबरोबरीने आपण संतांच्या सहवासात घडलो. संतांचे साहित्य आपल्यासाठी दिशादर्शक आहे, असेही ते म्हणाले.
संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना. धो. महानोर म्हणाले, साहित्याला आणि मराठी भाषेला जात, धर्म, पंथ नाही. साहित्यिकांची केवळ एकच जात असते ती म्हणजे उच्चतम साहित्य. साहित्यिकांना केवळ माणूस धर्म माहीत असतो. त्यामुळे माणसासाठी ते साहित्य साहित्यिकांकडून निर्माण होते. त्यामुळे संमेलनाचा अध्यक्ष ख्रिस्ती धर्मीय झाला तर चर्चा व्हायला नको. साहित्यिकाच्या साहित्यामध्ये त्याचे खासगी आयुष्य कधीही येत नसते. त्यामुळे साहित्यिकांच्या जात,धर्म,पंथ त्यावर टीका करणारे लोक हे मराठीच नाहीत, असाही टोला यानिमित्ताने लगावला.
खांद्यावर काळे झेंडे कशासाठी ?
संमेलनाच्या निमित्ताने अराजकता निर्माण होत आहे ही बाब निश्चितच खेदजनक आहे. हे झेंडे का, ते झेंडे खांद्यावर घेणे म्हणजे माणूस विचारी होणे असे नाही. मराठी भाषा जात धर्माच्या पलिकडची आहे. त्यामुळे संमेलनावरून वाद नको संवाद हवेत, अशी अपेक्षा मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
मंत्री, आमदार प्रेक्षकात बसले…
संमेलनाच्या निमित्ताने आलेले सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण यासह अनेक राजकारणी प्रेक्षकांमध्ये होते.. त्यामुळे उस्मानाबादच्या संमेलनातून राजकारण विरहित संमेलनाचा नवा पायंडा पुन्हा एकदा पडला. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.