जिल्हा क्रीडांगणावर मुलींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
कित्तूर राणी चन्नम्मा, बेळवडी मल्लम्मा, वनके ओबव्वा या वीर महिलांचा मुलींनी आदर्श घेणे काळाची गरज आहे. स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी कराटेसह इतर कला आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थिनींनी स्वतंत्रपणे जगण्याची कला शिकली पाहिजे, असे मत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडांगणावर दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलींच्या वसतिगृहासाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी त्यांनी वरील विचार मांडले. कित्तूर राणी चन्नम्मा, बेळवडी मल्लम्मा, वनके ओबव्वा यांनी अन्यायाविरोधात लढा दिला. कठीण परिस्थितीत तोंड दिले. त्यामुळेच आज त्यांचे नाव आजरामर आहे. तशाच प्रकारे प्रत्येक मुलींनी स्वतःची काळजी स्वतः घेण्यासाठी व स्वरक्षणासाठी कराटे कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
सरकारच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जात आहे. सशक्त भारतामध्ये प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वरक्षणासाठी कला शिकणे काळाची गरज आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये महिला व मुलींवर वाढते अत्याचार आणि हिंसाचारांच्या घटनांवरून आपण बरेच काही शिकले पाहिजे. प्रत्येकाने कला आत्मसात करून देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले.
सध्या तरुणी विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. हवाईदल, सैन्य दलामध्ये उच्चपदावर महिला काम करत आहेत. तेव्हा अशाच प्रकारे यापुढेही प्रगती करणे गरजेचे आहे. यावेळी कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळा आणि मुरारजी देसाई निवासी शाळेच्या विद्यार्थिनींनी कराटे कौशल्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
यावेळी समाज कल्याण खात्याच्या सहसंचालक उमा सालीगौडर, गौरीशंकर कडेचूर, मिलनट्टी, बी. बाळकृष्णन्, जिल्हा कृषी कल्याण अधिकारी बडीगेर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.