वेळापत्रकानुसारच पाठय़पुस्तके शाळेत घेऊन जाण्याचा दोन वर्षांपूर्वीच आदेश : पण, अद्यापही विद्यार्थ्यांच्या पाठीवर ओझेच
प्रतिनिधी /बेळगाव
शालेय वेळापत्रकानुसारच पाठय़पुस्तके शाळेत घेऊन जावीत, त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भार टाकला जाऊ नये, असा आदेश दोन वर्षांपूर्वी जारी करण्यात आला होता. परंतु, अद्यापही विद्यार्थी पाठीवरून पाठय़पुस्तकांच्या ओझ्यासह हातात खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी घेऊन जाण्याचे विदारक चित्र शहर परिसरात पहावयास मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील हे ओझे उतरणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हल्ली पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रत्येकी वजन 200 ग्रॅमहून अधिक आहे. त्याशिवाय अतिरिक्त साहित्यही दप्तरात असते. शाळांचे निश्चित वेळापत्रक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हे ओझे दररोज घेऊन जावे लागते. कायद्यात तरतूद असली तरी दररोजचा हा प्रवास त्यांना अत्यंत जिकीरीने करावाच लागतो. याबाबत एका विद्यार्थ्याकडे चौकशी केली असता, कोणते पुस्तक आणि वही केव्हा मागतील याचा नेम नसतो, त्यामुळे एवढे ओझे घेऊन जावे लागत असल्याची कैफियत त्याने मांडली.
सध्या शाळांचा अभ्यासक्रम (सिलॅबस) संपला असून उजळणीसाठी विद्यार्थी बॅग भरून पुस्तके, वहय़ा आणतात, अशी मखलाशी एका शिक्षणाधिकाऱयांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केली. प्रत्यक्षात अभ्यासक्रमाचे अवलोकन हे शिक्षकांच्या अधिपत्याखाली होत असल्याने अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ओझे वाहण्याची गरज नसल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी कायदा झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला नाही. परीक्षा काळ जवळ आला असतानाही विद्यार्थी पाठीवरून ओझे घेऊन जातानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
नो ‘बॅग डे’चाही बोजवारा
वेळापत्रकाप्रमाणेच पाठय़पुस्तके घेऊन जावीत, असा अध्यादेश दोन वर्षांपूर्वी जारी करण्यात आला आहे. त्याचा तरी बोजवारा उडाला आहेच, शिवाय शाळांमध्ये प्रत्येक शनिवार हा ‘नो बॅग डे’ म्हणून पाळला जावा, असा आदेश शिक्षण खात्याने दिला होता. त्याचेही तीनतेरा वाजले आहेत. शनिवारी विद्यार्थ्यांनी बॅगशिवाय शाळेत जावे, असा तो आदेश होता.
जागृती निर्माण व्हायला हवी
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याचा आदेश आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना सक्ती करीत नाहीत. पण याबाबत जागृती निर्माण व्हायला हवी.
– आर. पी. जुटन्नावर, गट शिक्षणाधिकारी, बेळगाव ग्रामीण
पालकांची भूमिकाही महत्त्वाची
‘नो बॅग डे’ सारख्या उपक्रमाची योग्य अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे घटविण्याबाबत जागृती होईल. यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे.
– गोविंद पाटील, सीआरसी