प्रतिनिधी/ चिपळूण
महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे सुरळीत चालवायचे असेल तर भास्कर जाधवांकडे विधानसभेचे अध्यक्ष देण्याबाबत सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. त्या बदल्यात शिवसेनेकडील वनमंत्रीपद काँग्रेसला सोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र आमदार जाधवांनी या तडजोडीला विरोध दर्शवला आहे. तडजोड न करता जबाबदारी मिळणार असेल तर आनंदाने स्वीकारू, अशी भूमिका त्यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे मांडली आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर शुक्रवारी येथे आलेल्या आमदार जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पावसाळी अधिवेशनापूर्वी एक दिवस अगोदर कॅबिनेटची बैठक झाली. त्यात आपणाला तालिका समितीचे अध्यक्ष करून अधिवेशनाला समोर जाण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आला. अध्यक्ष म्हणून काम करताना आपण केवळ भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबनच नव्हे तर 20 हजार कोटीचे पुरवणी बजेट मंजूर केले. 9 विधेयके मंजूर केली. विरोधी पक्ष सभागृहात नाही म्हणून कोणताही कायदा मंजूर होणार नाही. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सभागृहात कायद्याची माहिती द्यावी, नव्या सदस्यांसह सर्वांना त्याची माहिती होईल आणि नंतरच तो कायदा मंजूर केला जाईल, अशी अट आपण मंत्र्यांसमोर ठेवली होती.
..तर अध्यक्षपद आनंदाने स्वीकारेन
विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, मुळातच अधिवेशनातील 2 दिवसांच्या चर्चेनंतर हे पद आपणाला देण्याबाबत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे एकमत होते. मात्र त्या बदल्यात संजय राठोड यांच्या राजीनाम्याने रिक्त असलेले वनमंत्रीपद शिवसेनेने कॉंग्रेसला द्यावे, असा प्रस्ताव आहे. मात्र अशी तडजोड म्हणजे सरकार चालवणे एकटय़ा शिवसेनेची जबाबदारी असल्यासारखे आहे. त्यामुळे अशी कोणतीही तडजोड न करता वनमंत्रीपद शिवसेनेकडेच ठेऊन सर्वांच्या सहमतीने अध्यक्षपद देण्यात येणार असेल तर ते आपण आनंदाने स्वीकारू, अशी आपण पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना विनंती केली आहे, असे ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार नजीकच्या काळात होणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याला आनंद कशात वाटेल ते पत्रकार परिषदेत सांगून भावना पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे पाऊल उचलले असे मानण्यात येत आहे.
चिपळूणच्या शिवसेनेसाठी ‘मी’ आहे!
चिपळूणच्या शिवसेनेबाबत ते म्हणाले की, काही भावना उघडपणे न मांडता माझ्यावर विश्वास असेल तर एकत्र बसू, येथे कुणीही शिवसेना विस्कळीत करू शकत नाही. नवे, जुने सर्व एकत्र बसलो तर निश्चितच मार्ग निघेल. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके यांनी स्व-पक्षीयांवर जोरदार टीका केली होती. याशिवाय चिपळूण पंचायत समिती गटनेते राकेश शिंदे यांनीही शिवसेनेच्या कारभारावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.