समाजातील दुर्लक्षित घटकांना कायदेशीर मार्गदर्शन
प्रतिनिधी / रत्नागिरी
समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहचून नागरिकांना मुलभूत हक्कांची जाणिव करून देण्यासाठी विधीसेवा प्राधिकरण विविध उपकम राबवित असते. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष स्मरणोत्सव साजरा करण्यात येत असताना याचे औचित्य साधून विधीसेवा प्राधिकरण यांच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जावून कायदेविषयक जनजागृती करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरूवात रत्नागिरी जिल्हा न्यायालय येथे 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता प्रतिमा पूजनाने होणार आहे. सकाळी 9.30 वाजता मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा प्रमुख न्यायाधीश महम्मद कासिम शेख मुसा शेख यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देश पातळीवर राबविण्यात येत आहे. 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी जाऊन जनजागृती केली जाणार आहे.