कार्यकर्त्यांनी आत्तापासून कामाला लागावे : दीपक ढवळीकर यांचे आवाहन
प्रतिनिधी /धारबांदोडा
सावर्डे मतदारसंघ हा मगो पक्षाचा बालेकिल्ला आहे. मगो पक्षाचा अजूनही या मतदार संघात प्रभाव आहे. येणाऱया निवडणुकीत विनायक गावस हेच मगोचे उमेदवार असतील. राजकीय पातळीवर कितीही दबाव आला तरी पक्ष त्यांच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका बदलणार नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, असे आवाहन मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले.
धारबांदोडा पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य विनायक गावस यांना मगो पक्षात अधिकृतरित्या प्रवेश दिल्यानंतर ढवळीकर बोलत होते. पिळये येथील भूमिका देवस्थानच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर पक्षाचे संयुक्त सचिव महेश पणशीकर, खजिनदार अंनत नाईक, सदस्य अनिल नाईक, साकोर्डा पंचायतीच्या पंचसदस्य विंदा सावंत, धारबांदोडाच्या सरपंच स्वाती तिळवे व विनायक गावस हे उपस्थित होते.
आमदारांनी गद्दारी केली तरी, मतदार मगोशी प्रामाणिक
मगो पक्षाला नेस्तनाबूत करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्यांना ते शक्य झाले नाही. पक्षाने निवडून आणलेले आमदार जरी इतर पक्षांनी पळवून नेले असले तरी, पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते व मतदार अजूनही जागृत आहेत. त्यांच्याच बळावर पक्ष मजबूत आहे. मगोच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांनी जरी आपल्या स्वार्थासाठी पक्षाशी गद्दारी केली असली तरी, ते फार काळ राजकारणात टिकू शकले नाहीत. बालाजी उर्फ विनायक गावस हे सावर्डेसाठी योग्य नेतृत्त्व असून त्यांना निवडून आणण्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा असे आवाहन यावेळी दीपक ढवळीकर यांनी केले. सावर्डे मतदार संघात मगोची अजूनही दहा हजार मते आहेत. त्यात आणखी दोन ते तीन हजारांची भर घालण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे असे ते पुढे म्हणाले.
खाणी सुरु करण्याची घोषणा ही निव्वळ फसवणूक
मगो पक्षाला संघटनेची गरज भासत नाही. गोव्यातील मतदारांनी सिंह हे पक्षाचे चिन्ह कायम आपल्या हृदयात जपलेले आहे. त्यामुळे येणारे सरकार हे मगो पक्षाचे असेल असा दावाही त्यांनी केला. भारतीय जनता पार्टीचे सरकार गेली दहा वर्षे गोव्यात आहे. मात्र खाण उद्योग सुरु करण्यास तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेटवर्क उपलब्ध करुन देण्यास ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या अपयशाचे खापर भाजपा सरकार मागील सरकारच्या डोक्यावर फोडत आहे. निवडणुकीच्या तोंडावर खाण उद्योग सुरु करण्याची भाजपाची घोषणा, म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. खाण प्रश्नावर गेली चार वर्षे सरकार काय झोपा काढत होते ? असा प्रश्नही दीपक ढवळीकर यांनी उपस्थित केला.
आमदारांकडून मतदारांचा विश्वासघात : विनायक गावस
विनायक गावस म्हणाले, आपण धारबांदोडा पंचायतीमध्ये गेली वीस वर्षे स्वच्छ राजकारण केले. गेल्या अठरा वर्षांत एकदाही अविश्वास ठराव आणून सत्ता पालट करण्याची वेळ आली नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत मगो नेते सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सावर्डे मतदार संघातील मगो उमेदवारासाठी आपण काम केले. मात्र आमदाराने निवडून आल्यानंतर मतदारांचा विश्वासघात केला. येथील मतदार आपल्या मतांशी व मगो पक्षाशी प्रामाणिक आहेत, असे विनायक गावस म्हणाले.
आपण राजकारण प्रामाणिकपणे केले. येणाऱया निवडणुकीत आपल्याला केवळ एक संधी द्या. एकाही कार्यकर्त्याला वाऱयावर सोडणार नाही, याची हमी देतो, असे त्यांनी जाहीर केले. खाण अवलंबितांचे नेतृत्त्व करताना आपल्यावर अनेकदा राजकीय दडपण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस स्थानकात आपल्या विरोधात तक्रारी नोंदविण्यात आल्या. मात्र आपण खाण अवलंबितांसाठी सातत्याने लढत राहिलो. काही विरोधक आपल्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, असा अपप्रचार करतात. पण त्यांना माहीत नाही की, सावर्डे मतदार संघात निवडणूक जिंकण्यासाठी पैशांची गजर नाही. हे आजवर अनेकवेळा सिद्ध झाले आहे, असे गावस यांनी नमूद केले.
यावेळी सावर्डे मतदार संघातील नूतन समिती जाहीर करण्यात आली. यशवंत बांदोडकर यांनी स्वागत केले. गौतम सावंत यांनी विनायक गावस यांच्याविषयी आपले विचार मांडले. गोविंद बागकर यांनी सूत्रसंचालन तर स्वाती तिळवे यांनी आभार मानले.