देशातील एक प्रमुख विमानतळ म्हणून नवी ओळख
बेळगाव/ बेळगाव
विमानतळाने लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या विमान सेवेमध्ये मोठी झेप घेतल्याने एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून बेळगाव विमानतळाचे कौतुक करण्यात आले आहे. नुकतेच ऑथॉरिटीने ट्विट करत बेळगावमधून 39 हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे सांगितले आहे. यामुळे देशातील एक प्रमुख विमानतळ म्हणून बेळगावची नवी ओळख होऊ लागली आहे.
1200 हून अधिक विमानांची ये-जा
कोरोनामुळे 25 मार्चपासून देशांतर्गत विमान सेवा बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊनची नियमावली काहीशी शिथिल केल्यानंतर 25 मेपासून पुन्हा विमानसेवा सुरू करण्यात आली. 25 मेपासून 25 ऑगस्ट दरम्यान बेळगावमधून 39 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. तर 1200 हून अधिक विमानांची ये-जा होती. अद्यापही देशांतर्गत सेवेने गती घेतली नसतानाही बेळगावमधील विमानसेवेने मोठी झेप घेतल्याने हा एक विक्रम असल्याचे ऑथॉरिटीने म्हटले आहे.
प्रत्येक कर्मचाऱयाचे यश
हे मिळालेले यश विमानतळावर काम करणाऱया प्रत्येक कर्मचाऱयाचे असल्याचे बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या काळातही विमानतळाने उत्तम सेवा दिल्यामुळेच प्रवाशांनी विश्वासाने प्रवास केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बेळगाव प्रवासी संख्येत दुसऱया स्थानी
जुलै महिन्याच्या प्रवासी संख्येबाबत विमान प्राधिकरणाकडून आलेल्या आकडेवारीनुसार बेंगळूरमधून 4 लाख 38 हजार, बेळगावमधून 14,147, मंगळूर 6,428, गुलबर्गा 3278, म्हैसूर 2,787, बळ्ळारी 2,579, तर हुबळीमधून 901 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत बेळगाव कर्नाटकात दुसऱया स्थानी सलग दुसऱया महिन्यातही पोहोचले आहे.