भारताची पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका ‘विक्रांत’च्या बहुप्रतिक्षित समुद्री चाचण्या बुधवारपासून सुरू झाल्या. भारतीय नौदलाने या प्रसंगाला देशासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक’ दिवस म्हणून वर्णन केले आहे. या चाचण्यांमुळे भारत आता स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक विमानवाहू नौकांची रचना, निर्मिती आणि बांधणी करणाऱया देशांपैकी एक देश बनला आहे.
‘विक्रांत’ ही भारतातील सर्वात मोठी आणि अतिभव्य युद्धनौका आहे. ‘विक्रांत’चे वजन 40,000 टन आहे. तसेच सुमारे 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद आहे. याची पुनर्बांधणी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने केली आहे. ही युद्धनौका आता प्रथमच समुद्री चाचण्यांसाठी तयार आहे. 50 वर्षांपूर्वी 1971 च्या युद्धात याच नावाच्या जहाजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. विमानवाहू नौका, विमान चाचणी पूर्ण केल्यानंतर, पुढील वर्षाच्या दुसऱया सहामाहीत भारतीय नौदलात समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. ही युद्धनौका सुमारे 23,000 कोटी रुपये खर्च करून बांधली गेली आहे.
‘आत्मनिभर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील हा अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण आहे, असे भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक माधवाल यांनी स्पष्ट केले आहे जून महिन्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विमानवाहू युद्धनौकेच्या बांधकामाचा आढावा घेतला होता. या जहाजावर 30 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर तैनात करता येतील.
भारताकडे सध्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू युद्धनौका आहे. हिंद महासागर क्षेत्रात लष्करी उपस्थिती वाढवण्याच्या चीनच्या वाढत्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल आपली संपूर्ण क्षमता लक्षणीय वाढवण्यावर भर देत आहे. देशाच्या सामरिक हितसंबंधांसाठी हिंदी महासागर अत्यंत महत्त्वाचा आहे.