महिन्याभरात 8 हजार 600 प्रवाशांचा हवाई प्रवास
प्रतिनिधी / बेळगाव
विमान प्रवासाला बेळगावकरांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या विमानांमधून 8 हजार 653 प्रवाशांनी प्रवास केला आहे. हळूहळू विमान प्रवासाला प्रतिसाद वाढत असून पूर्वीप्रमाणे महिन्याला 30 हजारांचा प्रवासी टप्पा गाठण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोरोनाचा वाढता धोका ओळखून 25 मार्चपासून विमानसेवा बंद करण्यात आली होती. एरव्ही गजबजणाऱया विमानतळावर लॉकडाऊनमध्ये मात्र शुकशुकाट पसरला होता. लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच 25 मे पासून पुन्हा विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. प्रारंभीच्या काळात प्रवासी संख्या अत्यंत कमी होती. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता हळूहळू प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने विमानतळ गजबजू लागले आहे.
25 मे पासून मागील महिन्याभरात 8653 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. 5 विमान कंपन्या बेळगावमधून सेवा देत आहेत. मुंबई, बेंगळूर, पुणे, हैदराबाद, म्हैसूर, अजमेर, अहमदाबाद, इंदूर या शहरांना विमानसेवा सुरू आहे. एकूण 5 राज्यांमध्ये बेळगावमधून विमानसेवा देण्यात येत आहे. महिन्याभरात 342 विमानांची ये-जा केली. त्यामुळे प्रवाशांना येणे-जाणे सोपे झाले आहे.