पाटण्यात 23 जून रोजी विरोधक एकवटण्याची शक्यता, बैठकीच्या यशस्वितेवर नितीश यांचे भवितव्य अवलंबून
वृत्तसंस्था/ पाटणा
भाजपविरोधी पक्षांची 23 जून रोजीची प्रस्तावित बैठक बिहारच्या तसेच देशाच्या राजकारणावर खोलवर परिणाम करणारी ठरू शकते. नितीशकुमार यांच्या पुढाकाराने पाटणा येथे ही बैठक बोलावण्यात आली असून त्यात राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि देशातील अनेक मोठ्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी होऊ शकतात. नितीशकुमार यांच्या राजकीय स्थितीसाठीही ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपपासून फारकत घेतल्यापासून नितीशकुमार यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र आले तर 2024 मध्ये भाजपचा पराभव होऊ शकतो, असा दावा नितीशकुमार वारंवार करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपविरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी कंबर कसली असून त्यांच्यासाठी 23 जूनची संभाव्य बैठक राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जात आहे.
काँग्रेससह सर्व भाजपविरोधी पक्षांना भाजपविरोधात एकत्र आणणे हे एक आव्हानात्मक काम आहे. प्रादेशिक स्थितीनुसार विविध पक्षांची विचारधारा आणि प्रादेशिक महत्त्व वेगवेगळे असल्यामुळे अनेक पक्ष अजूनही संभ्रमात आहेत. अशा स्थितीत नितीशकुमार यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. वास्तविक, बिहारमधील जेडीयू सध्या पूर्वीइतकी मजबूत मानली जात नाही. सध्या बिहारमध्ये जेडीयू हा तिसरा पक्ष आहे. पण, नितीशकुमार यांची राजकीय स्थिती आजही अबाधित असल्यामुळेच त्यांच्या पुढाकाराने देशभरातील भाजपविरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांनी पाटण्यात येण्यास होकार दिला आहे. नितीशकुमार यांनी देशभर दौरे करून भाजपच्या विरोधात मोठी छावणी उभारण्याची कसरत सुरू केल्यानंतर अखेर 23 जून ही तारीख अंतिम झाली असली तरी बैठकीच्या यशस्वीतेबाबत देशभरातील राजकीय तज्ञांना प्रचंड उत्सुकता आहे.
भाजपच्या विरोधात आघाडी करणे इतके सोपे नाही हे नितीशकुमारांनाही माहीत आहे. काँग्रेससह प्रादेशिक पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. पण, या पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी नितीशकुमार प्रचारात गुंतले आहेत. हे पक्ष एकत्र बसतील तेव्हा चर्चेची फेरी सुरू होईल आणि भविष्यात आणखी चांगला मार्ग सापडेल, असा त्यांचा प्रयत्न आहे.