एटामध्ये विरोधकांवर बरसले मुख्यमंत्री
एटा जिल्हय़ाच्या जलेसर मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला लक्ष्य केले आहे. विरोधी पक्ष हा माफियांसोबत आहे. भाजप सरकारच्या काळात गुंड-माफियांवर बुलडोझर चालत राहणार आहे. भाजप सरकारकडून गुंडांवर कारवाई होतेय. एटामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात असून येथील रस्ते उत्तम दर्जाचे करण्यात येत असल्याचे योगी म्हणाले.
5 वर्षांमध्ये शेतकऱयांना मोफत पाणी पुरविले जाणार आहे. खारट पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करू, प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पूर्वी सप सरकारच्या काळात बॉम्बच्या स्फोटांचे आवाज ऐकू यायचे. परंतु आता हे आवाज बंद झाले आहेत. आता चहुबाजूला हर-हर-बम-बमचे नारे दिले जावेत असे म्हणत योगींनी अखिलेश यांना लक्ष्य केले आहे.
पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत 6 हजार रुपये दरवर्षी शेतकऱयांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. 2017 पूर्वी समाजवादी पक्षाने दिव्यांग, विधवा महिलांची पेन्शन रोखली होती. परंतु आमच्या सरकारने राज्यात एक कोटी लोकांना पेन्शन दिली आहे. एटा जिल्हय़ात गरीबांना महिन्यातून दोनवेळा मोफत धान्य सरकारकडून देण्यात येत असल्याचे योगी म्हणाले.
गरीबांना शौचालय, वैद्यकीय महाविद्यालयाची सुविधा, पीक कर्जमाफीची अन्य सुविधा, पदवी महाविद्यालये, आयटीआयची निर्मिती जिल्हय़ात करण्यात आली आहे. कल्याण सिंह यांची स्वप्ने साकार करण्यासाठी भाजप सरकार आवश्यक आहे. भाजप विजयी झाल्यावर एका हातात बुलडोझर आणि एका हातात विकासाची चावी राहणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.