वृत्तसंस्था/ भीलवाडा
कोरोना संकटकाळात देश-जगात भीलवाडा प्रारुपाची चर्चा होत आहे. परंतु तेथूनच आता एक चकित करणारे वृत्त समोर आले आहे. भीलवाडाच्या भदादा भागात एका व्यक्तीला स्वतःच्या मुलाच्या विवाहाकरता अनुमतीपेक्षा अधिक जणांना आमंत्रित करणे चांगलेच महागात पडले आहे. या विवाह सोहळय़ात सामील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर वराच्या आजोबाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
या बेजबाबदार कृत्याप्रकरणी जिल्हाधिकाऱयांनी वरपित्याला 6 लाख 26 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा विवाहसोहळा 13 जून रोजी पार पडला होता आणि यात शासकीय दिशानिर्देशांचे उल्लंघन करत 50 हून अधिक जणांना आमंत्रित करण्यात आले हेते. या विवाहसोहळय़ातच कोरोनाचा संसर्ग फैलावल्याने कुटुंबासमवेत 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हा प्रकार समोर येताच 58 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱयांनी विलगीकरण आणि आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या होणाऱया खर्चाची रक्कम वरपित्याकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाप्रकरणी बेजबाबदारपणासाठी एवढा मोठा दंड ठोठावला जाण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. वसुलीची नोटीस बजावण्यात आली असून तहसीलदारांना 3 दिवसांत हे काम पूर्ण करावे लागणार आहे.