साखर कारखान्यांतील कर्मचाऱयांचे तोंड ‘गोड’ करा : सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
राज्यात सुमारे 77 साखर कारखाने आहेत. 14 सहकारी, 63 खासगी मालकीचे आहेत. त्यापैकी 61 कारखाने सद्यस्थितीत सुरू आहेत. यामध्ये 55 हजार कर्मचारी कायमस्वरुपी तर दीड लाख कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. मात्र, या कर्मचाऱयांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते. याकरिता कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करून वेतनवाढ करावी, अशी मागणी कर्नाटक शुगर वर्कर्स फेडरेशनने विधानसौध येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आंदोलनाद्वारे केली आहे.
समीरवाडी, ता. मुधोळ येथील गोदावरी बायो रिफायनरीज लिमिटेड साखर कारखान्यामध्ये वेतनवाढ देण्यात आली नसल्याने कर्मचाऱयांना दैनंदिन गरजा भागविताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हय़ातील कागवाड, उगार खुर्द, समीरवाडी, मंडय़ा, हावेरी, संकेश्वर, रेणुका शुगर्स आणि इतर कर्नाटकातील काही साखर कारखान्यांत अद्याप सहावा वेतन लागू झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये आठव्या वेतनाची मागणी होत आहे. मात्र, अद्याप कर्नाटकात काही कारखान्यांत सहावा वेतनदेखील लागू झालेला नाही. दरम्यान, काही कारखाने राजकीय लोकांचे असल्याने वेतनवाढ आणि इतर लाभ मिळणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे येत्या काळात सातवा वेतन आयोग लागू करून इतर सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही कर्नाटक शुगर वर्कर्स फेडरेशनने आंदोलनाद्वारे केली आहे. यावेळी खासगी आणि सरकारी साखर कारखान्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस खात्यातील स्वच्छता कर्मचाऱयांची पुनर्नियुक्ती करा
कर्नाटक राज्य पोलीस खात्यात कित्येक वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करणाऱया स्वच्छता कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कर्मचाऱयांची पुनर्नियुक्ती करावी, अशा मागणीसाठी पोलीस खात्यातील स्वच्छता कर्मचाऱयांनी आंदोलन छेडले आणि पुनर्नियुक्तीच्या मागणीचे निवेदन मंत्री बी. श्रीरामुलू यांना सादर केले.
मंत्री श्रीरामुलू यांनी याबाबत पोलीस महानिरीक्षक आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले. पोलीस खात्यात सलग दहा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर स्वच्छता कर्मचारी काम करत होते. मात्र, त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी अडचणीत आले आहेत. अशा 977 कर्मचाऱयांना सेवेत रुजू करून घेण्याचे आदेशदेखील शासनाने दिले आहेत. मात्र, अद्याप याकडे दुर्लक्ष झाले आहे. सरकारी आदेशानुसार बडतर्फ करण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱयांना तातडीने सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणीदेखील सफाई कर्मचाऱयांनी केली आहे.
बेंगळूर पोलीस महानिरीक्षकांनी सुधारित केलेल्या प्रस्तावाला सहानुभूती दाखवून मंजुरी द्यावी आणि पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी स्वच्छता कर्मचाऱयांनी केली आहे.