कोरोनायुद्धासाठी पंतप्रधान मोदींचा ‘आत्मनिर्भरता’ मंत्र, चौथ्या लॉकडाऊनचीही घोषणा मात्र स्वरूप भिन्न असणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा उत्तेजित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रूपयांचे घसघशीत पॅकेज घोषित केले आहे. या पॅकेजमधून लघु व मध्यम उद्योग, कृषी, सेवा, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती व इतर सर्व क्षेत्रांना साहाय्य केले जाणार आहे. या पॅकेजची सविस्तर माहिती आज बुधवारपासून प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांनी चौथ्या लॉकडाऊनचीही घोषणा केली असून त्याचा प्रारंभ 18 मे पासून होईल. कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला ‘आत्मनिर्भरता’ हा मंत्र आचरणात आणावा लागेल, असे महत्वाचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशाला उद्देशून केलेल्या संदेशपर भाषणात निधीसाहाय्य आणि इतर सर्व घोषणा केल्या. साधारणतः 30 मिनीटे चाललेल्या त्यांच्या या भाषणात, देशाची पुढची दिशा स्पष्ट झाली आहे. त्यांनी घोषित केलेले पॅकेज स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10 टक्के इतके मोठे असून त्यात सर्व क्षेत्रांचा समावेश करण्यात आला असल्याचे दिसून येते.
दुहेरी आव्हान
कोरोना या विषाणूने साऱया जगाला अक्षरशः उद्धवस्त केले आहे. भारतावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. या संकटाने आपल्याला अनेक धडे शिकविले आहेत. त्यातून आपण शहाणे होत आहोत. यापुढच्या काळात आपल्याला स्वतःलाही वाचवायचे आहे आणि त्यासमवेतच आर्थिक प्रगतीही साधायची आहे. हे दुहेरी आव्हान स्वीकारण्याची क्षमता भारताच्या जनतेत निश्चितच आहे, असे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन त्यांनी या भाषणात केले.
आत्मनिर्भरता हा मंत्र
कोरोना संकटाच्या या काळात भारताला आत्मनिर्भरतेवर, अर्थात स्वयंपूर्णतेवर भर द्यावा लागणार आहे. आपण निर्धारपूर्वक कामाला लागलो तर सर्व क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्णता साध्य करणे मुळीच अशक्य नाही. कोरोनापूर्व काळात भारतात एकाही संरक्षक वेषभूषेचे (पीपीई किट) उत्पादन स्वदेशी पद्धतीने होत नव्हते. मात्र, कोरोनाने उभ्या केलेल्या आव्हानामुळे आज आपण दोन लाख संरक्षण वेशभूषा सामग्री आणि मुखावरणांचे (मास्क) उत्पादन करीत आहोत. अवघ्या दोन महिन्यांमध्ये हे आपण साध करून दाखविले आहे. यामुळे आपला आत्मविश्वास वाढला असून त्याचा लाभ पुढच्या काळात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना आपल्याला होईल असा विश्वास पंतप्रधना मोदी यांनी व्यक्त केला.
संकटाचे संधीत रूपांतर
कोरोना संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे आव्हान आपल्याला स्वीकारायचे आहे. त्यासाठी आपण सज्ज आहोत. आपण या आव्हानाचा स्वीकार केल्यास आपला भविष्यकाळ कधी नव्हे इतका उज्ज्वल असेल. भारताने आजवर अनेक संकटांवर मात करून आपली क्षमता सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी 2001 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाचे उदाहरण देऊन केले. या भूकंपाने कच्छ भागात सारेकाही उद्धवस्त केले होते. मात्र आज तोच भाग पुन्हा प्रगतीचा झगमगाट अनुभवत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
स्थानिक उत्पादनांवर विषेश भर
कोरोनाच्या या संकटकाळात आणि लॉकडाऊन असताना आपल्याला सर्वात मोठा आधार स्थानिक उत्पादने व उत्पादकांनी दिला आहे. त्यामुळे यापुढच्या काळातही आपण जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक उत्पादने आवर्जून खरेदी केली पाहिजेत. यामुळे स्थानिक पातळीवरच मोठी रोजगानिर्मिती होऊन अर्थव्यस्था बळकट होणार आहे, असा महत्वपूर्ण संदेश पंतप्रधान मोदींनी दिला. अप्रत्यक्षरित्या त्यांनी चीनी वस्तूखरेदीवरच शरसंधान केले असा त्याचा अर्थ काढला जात आहे.