बेळगावचे वैभव म्हणून ओळखला जाणारा भुईकोट किल्ला येथे आहे. या किल्ल्याच्या इतिहासाचे आणि येथील वास्तुंचे जतन करून याचे वैभव विकसीत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची गरज आहे.
वेणुग्राम किल्ल्याचा इतिहास रट्टांच्या साम्राज्यापासून सुरुवात होऊन मराठे, ब्रिटीश आणि स्वतंत्र भारत असा शेवट होतो. अंडाकृती आकाराचा हा किल्ला लांबी 910 मीटर व रूंदी 730 मीटरची असून शंभर एकरहून अधिक जागेत या किल्ल्याचा पसारा आहे. किल्ल्याला माती व मऊ लाल दगडांची मजबूत तटबंदी असून पाण्याने भरलेला रूंद आणि खोल खंदक खणून किल्ल्याची सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. किल्याला खंदकाच्या तळापासून बांधलेले अंदाजे 32 फूट उंचीचे अनेक बुरूज आहेत. किल्ल्याचे दोन भव्य प्रवेशद्वार हिंदुस्थानी शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. बाहेरील बाजूस प्राणी आणि पक्षांची चित्रे चितारण्यात आली आहेत.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारालगत आतील उजव्या बाजूस गणपती, दुर्गा आणि महिषासूरमर्दिनीची प्राचीन मंदिरे आहेत. प्रवेशद्वारालगत रणमंडळ लागते. याच भागातून खंदकात उतरण्यासाठी कालौघात अर्धवट बुजलेली चोरवाट आहे. बेळगाव भुईकोट किल्ला ते राजहंसगड भुयारी मार्ग असल्याचे बोलले जाते. परंतु कालौघात या भुयारी मार्गाची पडझड होऊन तो बंद झाल्याचे कळते. रणमंडळात शिरण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार असून खिळे ठोकलेला दिंडी दरवाजा आजही पहावयास मिळतो. डाव्या बाजूस पहारेकऱयांसाठी देवडय़ा आहेत. या देवडय़ांमध्येच मागील बाजूस बुरूजावर जाण्यास जिना आहे. प्रवेशद्वाराजवळ एक रूतलेली तोफ दिसून येते. सध्या किल्ल्यात 115 टीए बटालियनचे व भरती केंद्र आहे.
कमल बस्ती
याच्याच अलिकडे काही वर्षापूर्वी रामकृष्ण मिशनचा आश्रम उभारण्यात आला आहे. भगवान पार्श्वनाथ व नेमिनाथांची मूर्ती असलेली चालुक्मय शैलीची 1204 सालातील सुंदर जैन मंदिरे आहेत. किल्ल्यात नेमिनाथ पद्धतीची कलाकुसरी काळय़ा दगडावर कोरलेल्या दोन बस्ती आहेत. त्यातील एक कमल बस्ती नावाने सुपरिचित आहे. 12व्या शतकातील अविष्कृत केलेले दगडात कोरलेले कमळ म्हणजेच छतापासून डोकावणारे शिरपेचातील मुकुटमणी अर्थात कमळ 800 वर्षानंतरही त्याचं तेज जसंच्या तसं टिकून आहे. आणि याहीपुढे शेकडो वर्षे टिकून राहील. कलाप्रेमीनी निदान एकदा तरी पहावयास हवाच असा हा मौल्यवान अलंकार आहे. छताला कोरलेल्या अतीसुंदर भव्य दगडी कमल पुष्पावरून या बस्तीला कमल बस्ती हे नाव ठेवण्यात आले आहे. बस्ती, नेमिनाथ पंथातील चालुक्मय शैलीतील अतिशय देखणी आहे. तर दुसरे जैन मंदिर (चिक्की बस्ती) आहे. आदिलशाही काळात बांधलेल्या साफीया व जामिया नावाच्या दोन मशिदी व बद्रुद्दीन शहाचा दर्गा आहे. साफिया मस्जीद इ. स. 1519 मध्ये आसदखानने बांधली. जामिया मशीद इ. स. 1585-86 ला शेरखानने बांधली. कमल बस्तीच्या पुढे डाव्या बाजूस चालुक्मय शैलीतील कोरीव कामाने नटलेले शिवमंदिर आहे. या मंदिराचा केवळ सभामंडप शिल्लक असून, गाभारा व वरील भाग नष्ट झाला आहे.
1631 मध्ये पश्चिमेकडील प्रवेशद्वार बांधण्यात आले. शत्रुला किल्ल्याच्या बाहेर थोपवून धरण्यासाठी कमानीखालून जाणारा मार्ग (आर्च वे) दोन मोठाल्या सरपळय़ा दोन खांबाना बांधून झुलता पुल ओढून वर घेण्याचे तंत्र काळजीपूर्वक वापरण्यात आले होते. किल्ला हिंदू, जैन आणि मुस्लीम वास्तुशिल्पाने प्रभावित आहे. बेळगाव भुईकोट किल्ल्याची वैभवशाली परंपरा असून सहय़ाद्री रांगांच्या सान्निध्यात तळपणारा किल्ला बेळगावचे अनमोल वैभव आहे. किल्ल्याजवळून वाहणारी नदी म्हणून मार्कंडेय नदीचा उल्लेख येतो. स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 साली महात्मा गांधी व त्यानंतर बाबसाहेब नरगुंदकर यांना किल्ल्यात कैद करून ठेवल्याचे समजते.
बाबासाहेब नरगुंदकर समाधी
धारवाड जिल्हय़ातील नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब नरगुंदकर यांना ब्रिटीश पॉलिटीकल एजंट मॅनसन यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली 1858 साली कैदी म्हणून किल्ल्यात ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांना पकडण्यासाठी आलेल्या मॅनसनबरोबर त्यांची झटापट झाली व शेवटी बाबासाहेबांनी त्याचे मुंडके उडवून गावच्या वेशीत टांगून ठेवल्याच्या आरोपाखाली बेळगाव किल्ल्यात त्यांच्यावर कोर्टमार्शल करण्यात येऊन त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर त्यांना साखळदंडानी जखडून बैलगाडीत उभे करून अस्पृश्यांना बैलगाडी ओढण्यास सांगून बेळगावमधील नरगुंदकर चौकातून सुरुवात करून प्रमुख गल्ल्यातून त्यांची धिंड काढण्यात आली व ज्योती कॉलेज शेजारील लष्कराच्या जागेत त्यांना 12 जून 1858 साली फाशी देण्यात आली. बाबासाहेबांना फाशी दिल्याचे समजताच ब्रिटिशाकडून विटंबना होऊ नये म्हणून त्यांच्या मातोश्री यमुनाताई व पत्नी सावित्री यांनी उडी मारून मलप्रभा नदीला जवळ केले. त्या तिघांच्या समाधी आजही लष्करी जागेत पहावयास मिळतात.
पोर्तुगिजांच्या ताब्यातील गोव्याजवळ असल्यामुळे ब्रिटीश काळानंतरदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने महत्व होते. गोवा मुक्ती संग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठवण्यात आले होते.
संवर्धन-सुशोभिकरण गरजेचे
बेळगावचा भुईकोट किल्ला म्हणजे बेळगाव शहराच्या छातीवर मिरवणारा तेजस्वी हिरा. या हिऱयाला अगणित वीर योद्धय़ांच्या समृद्ध बलिदानाने मौलिक पैलू पाडले गेले आहेत. वर्षानुवर्षे ते पैलू दिवसागणीक तेजाळणार आहेत.
कमलबस्तीतल्या कमलपुष्पासारखाच किल्लादेखील तळपतो आहे. त्याचं संवर्धन करणं हे प्रथमतः नागरिकांचे पर्यायाने सरकारचे आद्यकर्तव्य आहे. बेळगाव नगरीचा हा तेजोमय दागिना इतिहासजमा होण्याआधीच सुदृढ राखावयास हवा, सांभाळावयास हवा. तटबंदीवर उगवलेल्या निरूपयोगी खुरटय़ा झुडपांचा सफाया करून तटबंदीची होणारी पडझड वेळीच थांबवली गेली पाहिजे. तटबंदीच्या आतील बाजूस टाकलेल्या भरतीवर पायवाटा बांधून उतारावर बागा फुलवावयास हव्या. खंदकाला तटबंदीच्याविरूद्ध दिशेला सुरक्षा भिंती उभारून कॅन्टोन्मेंट हद्दीतून किल्ल्याला बाहेरून प्रदक्षिणा घालणारा रस्ता करावयास हवा. रस्त्याच्या दुतर्फा बगीचा फुलवून किल्ल्याची शोभा वाढवावयास हवी. किल्ल्याचा विकास केला तर आपोआपच भुईकोट किल्ला परिसर एक उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ बनेल. स्मार्ट सिटी बेळगावचा लौकीक वाढेल. बेळगाव शहर स्मार्ट होण्याच्या मार्गावर असताना त्याचे स्मार्ट काळीज दुर्लक्षिले जाणार नाही, याची काळजी घ्यावयास हवी.
किल्ल्याच्या चारी बाजूस असलेल्या खंदकाची संपूर्ण सफाई करून येथे बोटींगसारखा पर्याय सुरू करता येऊ शकतो तसेच या खंदकवजा तलावात बदक, हंस यासारखे पक्षी आणि काही प्राण्यांचा विहार सुरू केल्यास किल्ला परिसराचे सौंदर्य अधिकच बहरू शकते, याचा विचार करून किल्ल्याचे वैभव विकसीत करण्याची गरज आहे. (उत्तरार्ध)
मधू पाटील, कंग्राळी खुर्द