कारदगा येथील प्रकार : नुकसानग्रस्तांच्या नावांना डावल्याचा आरोप : ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण : ऐन दिवाळीत वातावरण तापले
वार्ताहर /कारदगा
जुलै महिन्यात झालेल्या भयंकर पावसामुळे दूधगंगा नदीकाठ परिसरातील अनेक नागरिकांची घरे पाण्यामुळे जमीनदोस्त झाली. अशा घरांचा पंचनामा करण्यात आला. पण त्यात चुकीच्या नोंदी करण्यात आल्याने सदोष अहवाल तयार करण्यात आला आहे. शंभर टक्के नुकसान झालेल्या घरांना ‘क’ वर्गामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. अशा नुकसानग्रस्तांना ‘अ’ अथवा ‘ब’ वर्गात समाविष्ट करणे गरजेचे होते. पण जाणीवपूर्वक सदर नुकसानीचा अहवाल चुकीचा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त नुकसानग्रस्तांनी पंचायत विकास अधिकारी व लेखनिकास कार्यालयात डांबून उपोषण केले.
पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. पण त्याही अधिकाऱयांनी निवेदनाला केराची टोपली दाखविल्याने अखेर सदर निर्णय घेत ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. ऐन दिवाळीत कारदगा पंचायत व्याप्तीतील सदर प्रकरणावरून वातावरण तापले आहे. असे असताना संबंधित अधिकारी जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार, असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला. कारदगा भागातील सुमारे 300 घरांना पुराचा फटका बसला. त्याची पाहणी पंचायत विकास अधिकारी व नोडल अधिकाऱयांनी केला. पण त्यातील नोंदीमध्ये चुका केल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. अनेक नुकसानग्रस्तांचे शंभर टक्के नुकसान होऊनही केवळ 50 हजारांची मदत घोषित करण्यात आली आहे. ती अपुरी असून नुकसाग्रस्तांच्या भावनांशी सरकार खेळत आहे.
निवेदन स्विकारुन संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्यात येईल, असे दिलेले आश्वासन आता हवेत विरले आहे. परिणामी कारदग्यातील नुकसानग्रस्तांवर अन्याय झाला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. सदर उपोषणात पंचायतीच्या 23 सदस्यांसह पंचायत अध्यक्ष सुदीप उगळे, उपाध्यक्षा रशिदा पटेल, जि. पं. माजी सदस्या सुमित्रा उगळे, ता. पं. माजी सदस्य दादासो नरगट्टे यांच्यासह सर्व सदस्य व पूरग्रस्त सहभागी झाले होते.