बीएचयूत 1 वर्षाचा अभ्यासक्रम – नैतिकतेसह न्यायमीमांसेच्या श्लोकांचे करणार अध्ययन
वृत्तसंस्था/ वाराणसी
बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थी आता वैदिक काळातील कायद्यांचे धडे गिरविणार आहेत. वाराणसी येथील वैदिक विज्ञान केंद्रात वैदिक विधी शास्त्राचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होतोय. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वेदच्या आधारावर ‘कायदा-सुव्यवस्था’ प्रस्थापित करणे शिकविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमात वेद आधारित न्यायप्रणालीसोबत नैतिक शिक्षणही सामील करण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा हा अभ्यासक्रम देशभरातील कायदेतज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आला आहे.
सद्यकालीन कायद्यांमध्ये काही त्रुटी आहेत, त्यांचा लाभ घेत गुन्हेगार शिक्षेपासून दूर राहतात. पण प्राचीन भारताच्या न्यायव्यवस्थेत असे शक्य नव्हते. याचबरोबर आज कायद्याच्या मर्यादित व्याख्येमुळे योग्य नैतिक आधारावर न्याय होत नाही. याच त्रुटींवर भारताचा वैदिक ग्रंथ ‘न्याय मीमांसा’च्या आधारावर कशाप्रकारे तोडगा काढला जाऊ शकतो हे या अभ्यासक्रमात शिकविण्यात येणार असल्याचे संबंधित तज्ञांनी म्हटले आहे.
सामाजिक न्याय
वेदांना नीति आणि न्यायापासून वेगळे ठेवता येत नाही. त्या काळात सामाजिक न्यायाची देखील व्यवस्था होती. याचमुळे न्यायादरम्यान व्यक्तीच्या सामाजिक वर्तनावरही लक्ष देण्यात यावे. न्यायमीमांसेच्या 1 हजार श्लोकांमध्ये अत्यंत विधिवत पद्धतीने न्यायव्यवस्थेची बाब मांडण्यात आली आहे. या श्लोकांचा अर्थ सांगून विद्यार्थ्यांना याचे अध्ययन करविण्यात येईल. कुठल्याही प्रकरणी वैदिक न्यायाच्या आधारावर कुठला निर्णय घेतला जाऊ शकतो हे शिकविण्यात येणार असल्याचे वैदिक विज्ञान केंद्राचे समन्वयक प्राध्यापक उपेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले आहे.
राजधर्म अन् सुशासनाचा पाठ
वैदिक विधि शास्त्रात न्याय मीमांसा, राजधर्म, सुशासन आणि वैदिक पर्यावरण कायद्यांबद्दल उहापोह केला जाणार आहे. तर संस्कतचे शब्द, कर्तव्य आधारित न्याय, कौटुंबिक कायदे, वैवाहिक संबंध, पितृत्व, संतती, दत्तकपुत्र विधी, संयुक्त हिंदू परिवार, उत्तराधिकारी विधी आणि हिंदू महिलांच्या मालमत्ता अधिकार इत्यादींवर विस्तृत शिक्षण दिले जाणार आहे.