प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणुचा प्रसार वाढत चालला असून, दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच पर राज्यातून येणाऱया नागरिकांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासह परराज्यातून येणाऱया नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी वॉर्डस्तरीय टास्कफोर्स कमिटी नियुक्त करण्याचा आदेश नगरविकास खात्याने महापालिकेला बजावला आहे.
कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात अडीच महिना संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे कोरोनाची लागन झालेल्या रूग्णांची संख्या देखील स्थिर होती. मात्र जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. व्यवहार करताना सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पण सहसा याचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच पर राज्यातून येणाऱया नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रासह बेंगळूर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असल्याने शहरातील नागरिकांचा कल आपल्या मूळ गावी परतण्याकडे वाढला आहे. त्यामुळे शहरात पुणे, मुंबई, बेंगळूर अशा विविध शहरातून येणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. पण बेळगावमध्ये दाखल झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागन झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाची लागन झालेले रूग्ण रूग्णालयामधून घरी परतले आहेत. मात्र अलिकडे कोरोनाची लागन झालेल्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. तसेच मृत्यूच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. काहीवेळा परराज्यातून येणाऱया नागरिकांची माहिती मिळत नाही. त्यामुळे राज्य शासनाने वॉर्डस्तरिय टास्कफोर्स कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली टास्कफोर्स कमिटी स्थापन करण्याचा आदेश महापालिकेला बजावला आहे. वॉर्डचे स्वच्छता निरिक्षक, महसूल निरीक्षक, बिल कलेक्टर, आशा कार्यकर्ते, संबंधीत विभागातील आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्वसहाय्य संघटना, सामाजिक संघटना आदींची कमिटी करण्याची सूचना करण्यात आली आहे. परराज्यातून येणाऱया नागरिकांची माहिती घेणे तसेच कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती आरोग्य विभागाला देणे, क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवणे अशा विविध जबाबदाऱया टास्कफोर्स समितीच्या असणार आहेत. सदर टास्कफोर्स समितीची स्थापना तातडीने करावी अशी सूचना करण्यात आली आहे. यामुळे कोविड-19 च्या कामात व्यस्त असलेल्या मनपा अधिकाऱयांवर टास्कफोर्स कमिटी स्थापन करण्याची जबाबदारी वाढली आहे.