तसे लेखाचे इंग्रजी शिर्षक ‘फिल्मी’ वाटण्याची शक्मयता आहे. ही गोष्ट आहे एका बहुचर्चित आणि गाजलेल्या मुलाखतीची. बी.बी.सी रेडिओच्या ‘टुडे’ नावाच्या एका कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारीत झाली होती. गुगल वर शोध घेतल्यास, ही मुलाखत सहज उपलब्ध होते. मुलाखत घेणारी व्यक्ती आहे अतिथी संपादक ‘प्रिन्स हॅरी’. उत्तर देणारी व्यक्ती आहे, अमेरिकेचे माझी राष्ट्राध्यक्ष ‘बराक ओबामा’. दोघेही जगप्रसिध्द आणि वलयांकित. ‘व्हाईट हाऊस’ सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिल्या जाणाऱया जाहीर मुलाखतीत बराक ओबामा तत्कालिक राष्ट्राध्यक्षांना त्यांनी त्यावेळेला केलेल्या निंदनीय टिका-टिप्पणीबाबत, काय प्रत्युत्तर देतात? याकडे साऱया जगाचं लक्ष लागून होते. या मुलाखतीत दिसून आला बराक ओबामांचा संयतपणा, समजंसपणा. जगाविषयीची कणव आणि अर्थातच पत्नी-मिशेल विषयी अगाध प्रेम. ‘जेव्हा लोक खालच्या पातळीवर उतरतात, तेव्हा आपण वरच्या पातळीवर जावे’ अशी उक्ती मिशेलनेच बराक यांना शिकवलेली आहे. या उभयंतांमधील परस्पर आदर आणि सन्मान साऱया जगाने बराक ओबामांच्या निरोपाच्या भाषणात अनुभवला होता. ओबामांचा मिशेलविषयी बोलताना दाटून आलेला कंठ, मिशेलचे कृतज्ञतेने भरुन आलेले डोळे, विद्वत आणि गणमान्य सभाजनांनी दिलेल्या मानवंदनेचे हे भाषण देखील जाणकारांना ‘यु टयूब’वर सहज उपलब्ध होऊ शकते.
‘व्हाईट हाऊस’ सोडल्यानंतर ओबामांच्या जीवनात काय फरक पडला आहे? ह्या सलामीच्या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘आता हाताशी अधिक मोकळा वेळ असतो. अंमळ उशीरा उठता येते. पत्नीसोबत न्याहरी करताना गप्पा मारता येतात. मुली मोठय़ा होत आहेत, त्यांना अधिक वेळ देता येतो. हे झाले काहीसे वैयक्तिक. मात्र राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यावर ज्या गोष्टी करावयाच्या राहून गेल्यात, त्या जगभरात अजूनही तशाच आहेत. त्या बदलाव्यात यासाठी जेथे जेथे पाठपुरावा करावा लागतो तो मी करत असतो. निव्वळ अमेरिकेमध्येच नव्हे तर जगभरातल्या शाळायोग्य मुलांना चांगले शिक्षण मिळावे, ज्यांची योग्यता आहे आणि काम करण्याची ईच्छा आहे, भविष्यातील पिढीला चांगले पर्यावरण मिळावे याकरीता पर्यावरण संवर्धन-संतुलनासाठी मी काम करत असतो’.
सर्व स्तरातल्या सत्तास्थानावरील लोकांनी ‘सोशल मिडीयाचा’ वापर अधिक जबाबदारीने करावा असे ओबामांचं कळकळीचे सांगणे आहे. सत्तास्थानातील धुरीणांनी ट्विटर सारख्या माध्यमांचा अविवेकी वापर टाळावा असेही त्यांनी सुचवले. सहज आणि नियमीत ‘ऑनलाईन’ भेटणाऱया लोकांनी अधून-मधून का होईना ‘ऑफ-लाईन’ म्हणजेच प्रत्यक्ष समोरासमोर देखील भेटले पाहिजे असे ओबामांना वाटते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र येणाऱया, मैत्रभाव प्रकट करणाऱयांनी पबमध्ये, प्रार्थनास्थळांमध्ये, सार्वजनिक जागांमध्ये भेटून एकमेकांविषयी अधिक जाणून घेतले पाहिजे. इंटरनेटवरील अनामिक माणसे ही अनेकदा सोप्पी-सुलभ वाटत असतात. प्रत्यक्ष भेटीत कदाचित आपण एकमेकांना अप्रिय, कर्णकटू, प्रसंगी क्रूरदेखील वाटू शकतो. प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मनाची आणि कामाची सामाईक भूमिका तयार होऊ शकणार नाही. ‘हॅशटॅग’ चा संदेश पाठवणे हे बदलाच्या दृष्टीने पहिले पाऊल असू शकते. जाणीवजागृती सुरु करण्याचा मार्गही असू शकतो. मात्र शाश्वत बदलासाठी आपल्याला प्रत्यक्ष काम करावे लागेल, असेही ओबामा सांगतात. पेशाने वकील असणारे ओबामा सोशल मिडीयाच्या नियंत्रणाच्या बाजूचे नाहीत. सर्वसाधारण
अमेरिकावासियांप्रमाणे त्यांचेही स्वातंत्र्यावर प्रेम आहे. स्वातंत्र्यासोबत येणारा ‘विवेक’ आणि ‘जबाबदारी’ तेवढीच महत्वाची आहे असे त्यांना वाटते. ते म्हणतात, ‘सोशल मिडीयाचे तंत्रज्ञान हे आपला एकत्रित-सामूहिक आवाज तयार करते? की आपल्या मुद्यामधील टोकाची विविधता, समंजस संवादाअभावी आपल्याला विघटनाकडे नेते याचाही डोळस विचार व्हायला हवा’. ओबामांच्या मते, ‘इंटरनेटचे जग हे अनेकदा आभासी असू शकते. माहितीचा स्त्राsत हा चुकीचा असल्यास आणि वारंवारच्या असत्य तसेच भ्रामक माहितीमुळे लोकांची मते पूर्वग्रहदूषित होऊ शकतात. त्यामुळे नेतृत्व करणाऱया सर्वच जबाबदार लोकांनी इंटरनेटच्या जगतात अधिकाधिक संवादाच्या सामाईक जागा स्थापित करण्याचे कल्पक मार्ग शोधले पाहिजे’.
हा ‘वार्तासंवाद’ लंडन शहरात दोन धुरीणांमध्ये झालेला असला तरी या मुलाखतीत प्रकट झालेल्या चिंतनाचा आवाका वैश्विक आणि आपल्याही अनुभवाशी तादात्म्य पावणारा आहे. उत्तर आधुनिक (पोस्ट मॉडर्न) जगात आढळणारी टोकाची आत्ममग्नता आणि व्यक्तिवाद आता आपल्यालाही पावलोपावली जाणवत आहे. आपणही सामाजिक माध्यमाच्या मायाजाळात गुरफटत चाललो आहोत. माध्यमे मानव जातीच्या कल्याणासाठी, विकासासाठी सहाय्यभूत होण्याऐवजी आपण माध्यमांना अकारण वरचढ होऊ देत आहोत. मिळणाऱया माहितीची वैधता न तपासता, आपणही उतावीळतेने अनेक संदेश पुढच्यांना पाठवून वैचारिक-भावनिक गोंधळ वाढवण्यास कारणीभूत ठरतो, याचेही भान आपल्याकडून अनेकदा हरवलेले असते. साधारणतः ऐंशीच्या दशकात ‘दूरचित्रवाणीः शाप की वरदान’ हा निबंध लिहीलेले-वाचलेले आपण सुजाणतेने विवेकाने वापरल्यास दूरचित्रवाणी मानवी विकासासाठी सहाय्यभूत आहे असा पवित्रा घ्यायचो. आता ज्या फेसबुक आणि व्हॉट्अप गटांचे आपण सभासद आहोत, ते गट सर्वसमावेशी नाहीत हे आपल्यालाही ठाऊक असते. विरोधी मतांप्रती आपली स्विकारहार्यता तर दूरच, मात्र ऐकून घेण्याबाबतही आपल्यामध्ये किमान पातळीवरची सहिष्णुता नसते. नागरी-सामाजिक समस्यांवर साधक-बाधक विचार करुन, चर्चा सामोपचाराऐवजी एकमेकांच्या विरोधात लढणाऱया-जुंपणाऱया गटांचे आपणही मूक साक्षीदार असतो. या सर्व एकांगी गटांना अनुभवल्यावर ओबांमांचं म्हणणं आपल्याला अधिक प्रत्ययकारी भासू लागते.
ओबामा वयाच्या अवघ्या चाळीशीच्या सुरुवातीस व्हाईट हाऊसमध्ये आले आणि दोनदा राष्ट्राध्यक्ष होऊन अर्धशतकी वयात बाहेरसुध्दा पडले. सर्वसामान्य नागरिकांसारखा त्यांचा वावर, प्रगल्भता आणि चिंतनपर वृत्तीची आपल्याला भुरळ पडते. आपल्याला ओबामा आवडू शकतात. त्यांचे विचारही पटू शकतात. बराक आणि मिशेल यांचे दाम्पत्य जीवनही आपल्याला आदर्शवत वाटेल. पत्नीच्या मदतीने, सहकार्याने, सहचार्याने जीवनाची आणि राष्ट्राध्यक्ष पदाची वाटचाल सुकर झाल्याचे प्रांजळपणे जाहीर मुलाखतीत सांगतात. एवढी नितळ पारदर्शकता आणि मनाचा मोठेपणा आपल्या सार्वजनिक जीवनात आहे काय? असा जाहीर प्रश्नही आपल्याकडे वावदुकपणाचा ठरु शकतो.
पूर्वी रेल्वेमधून, बसमधून प्रवास करताना सहप्रवाशांसोबत हवापाण्याच्या, शिळोप्याच्या, अगदी राजकारणाच्यादेखील गप्पा व्हायच्या. माणसांना आणि माणुसकीला भिडण्याचे आपण टाळत चाललो आहोत. लग्नसमारंभात, प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी माणसं एकमेकांशी बोलायचं सोडून मोबाईलमध्ये गुंतलेली दिसतात. या पार्श्वभूमीवर प्रिन्स हॅरीने घेतलेली ओबामांची मुलाखत आणि त्यातील सामाजिक माध्यमे वापरासंदर्भातील प्रश्नोत्तरे आपल्याही संदर्भात सुसंगत आणि समर्पक वाटायला लागतात.
डॉ. जगदीश जाधव