कानपूर येथील एचबीटीयु विश्वविद्यालयात एक अभिनव संकल्पना साकारत आहे. या विश्वविद्यालयाची स्थापना होऊन शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या शंभर वर्षांचा या विश्वविद्यालयाचा इतिहास सविस्तररीत्या संकलित करण्यात आला असून तो पुढील एक हजार वर्षे सुरक्षित राहील, अशा प्रकारे त्याचा संग्रह करण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हा इतिहास एका कॅप्सुलमध्ये सीलबंद करण्यात आला आणि ही कॅप्सुल दहा मीटर खोलीवर पुरण्यात आली. नंतर या जागेवर एक स्तंभरूपी वास्तू उभी करण्यात आली. या विश्वविद्यालयाचा इतिहास सहा हजार पृ÷ांचा असून तो सुरक्षित ठेवण्यासाठी चारशे किलोग्रॅम वजनाच्या गनमेटलपासून कॅप्सुल बनविण्यात आली आहे. हा इतिहास या कॅप्सुलमध्ये एक हजार वर्षेपर्यंत कोणतीही हानी न होता सुरक्षित राहू शकतो. बॉम्बहल्ला झाला तरी या कॅप्सुलला कोणताही धोका होत नाही, असा दावा करण्यात आला आहे.
या शंभर वर्षांच्या इतिहासामध्ये विश्वविद्यालयाची स्थापना, त्याने केलेले महत्त्वाचे कार्य, अनेक नकाशे, विश्वविद्यालयात लागलेले शोध, विश्वविद्यालयाची सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील कामगिरी तसेच विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाच्या बैठका व वृत्तान्त, विद्यापीठाचे इतर क्रियाकलाप, आर्थिक व्यवहार, विद्यार्थी व त्यांची कामगिरी इत्यादी सर्व माहिती संकलित करण्यात आली आहे. या माहितीची हार्डकॉपी आणि सॉफ्टकॉपी अशा दोन्ही या कॅप्सुलमध्ये साठविण्यात आल्या आहेत. या कॅप्सुलचे वजन 600 किलोग्रॅम आहे. त्यातील शंभर किलोग्रॅम वजनाच्या आतील भागात संपूर्ण इतिहास साठविण्यात आला आहे. नंतर कॅप्सुलमध्ये नायट्रोजन वायु भरून ती सीलबंद करण्यात आली आहे. नायट्रोजन वायुमुळे आतील सामग्री कायमची सुरक्षित राहणार आहे. हजार वर्षांनंतर कोणी उत्खनन केल्यास त्याला या विश्वविद्यालयाचा संपूर्ण क्रमवार इतिहास हाती लागणार आहे.