प्रसाद सु. प्रभु /बेळगाव
22 मार्च 2020 चा पहिला जनता कर्फ्यु झाला. त्यानंतर अखंड लॉकडाऊन, नंतर रात्रीची संचारबंदी, त्यानंतर रविवारची बंदी आणि वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या. या साऱया काळय़ात ज्यांना या रोगाची लागण झाली नाही. ते सुदैवीच म्हणावे लागतील. मात्र, ज्यांना ज्यांना ही बाधा झाली किंवा ज्यांच्या आप्तस्वकियांना कोरोना लागला त्यांचे हाल म्हणजे नरकयातनाच. यापैकी अनेकांनी आपले अनुभव ‘तरुण भारत’ला सांगितलेत. यावर आवाज उठवा, आमच्या मरणयातना इतरांना सांगा मात्र नाव उघड करू नका, अशी विनंतीही केलीय. या साऱयांचे एकच मागणे आहे असे त्रास… असे हाल शत्रुलाही नकोत…! हीच.
आणि आईने मान टाकली
अनेकजण कोरोनातून सुटले. अनेक या रोगातच दगावलेत. काहींना कोणीच उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. इस्पितळांचा दरवाजा ठोठावतानाच अनेकांनी अखेरचा श्वास घेतलाय. मरण किती स्वस्थ होतं याचा अनुभव आल्याचे एका नामवंत वकिलाने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. आपली आई हृदयरोगानेग्रस्त होती. नेहमी उपचार करणाऱया डॉक्टरांनी झापडी बंद केली. अशातच मध्यरात्री त्रास सुरू झाला. कसेबसे रात्र काढली. आईचा श्वास कमी होत होता. तर हृदयाची धडधड वाढत चालली होती. दुसऱया दिवशी शहरातील प्रत्येक इस्पितळात जाऊन दाद मागितली. मात्र, सर्वांचे एकच उत्तर कोरोना अहवाल घेऊन या. अखेर दुपारी नाईलाजास्तव सिव्हिलकडे गेलो. तिथे स्ट्रेचरवरून तिला नेण्यासही कोणी आले नाही. अखेर कसेबसे तिला उचलून चालवत आत जातानाच आईने मान टाकली. हे सांगताना वकील महाशय ओक्साबोक्सी रडत होते. मला माझ्या आईला वाचवायचे होते हो असे ते म्हणाले. त्यांच्या मनातील असाहाय्यतेतून आलेले ते दुःखद उद्गार मन व्याकूळ करणारे असेच होते. आपण वकील आहोत कायदेशीर लढू शकतो. पण कुणाविरुद्ध लढून आपली आई परत मिळणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आमचे जीवन व्यर्थ
कोरोना पॉझिटिव्ह असा अहवाल आलेला आपला मेहुणा सिव्हिल हॉस्पिटलच्या दुर्लक्षाने दगावलाय. मी त्यांना कधीही माफ करणार नाही, असे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत एकाने उद्वेगाने सांगितले. मी त्याच्याशी सतत संपर्कात होतो. तो घाबरला होता आणि औषधे व वैद्यकीय साहाय्य वेळेत मिळत नसल्याने खचलाही होता. आम्ही वेगवेगळे संपर्क वापरून संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही फोन उचललाच नाही. अखेर बोलता बोलताच मेहुणा शांत निपचित पडला. चालू असणाऱया फोनवरून त्याचा शेवटचा प्रवास जाणवत होता. त्याला त्या अखेरच्या क्षणात साथ द्यायला डॉक्टर तर नव्हतेच आणि आपणही जाऊ शकत नव्हतो. हे शल्य कायमचे मनात राहील. महाभयंकर रोगात जी औषधे राजकीय पुढारी आणि व्हीआयपी ना दिली जातात ती आमच्यासारख्या गरिबांना सिव्हिलमध्ये मिळत नाहीत. यामुळे आमचे जीवन व्यर्थ आहे हो, असे सांगत होता. त्याचाही बांध फुटला होता.
पत्नी निगेटिव्ह मी पॉझिटिव्ह
कोरोनाच्या चाचण्यांवर अपील कोठे करायचे? असा प्रश्न सध्या वडगाव भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला सतावत आहे. पत्नीचा आजार बरा होत नाही म्हणून दाखवायला सिव्हिलमध्ये गेल्यावर पत्नीसोबत त्यांचाही स्वॅब तपासणीस घेण्यात आला. दोघेही इस्पितळात दाखल झाले. चार दिवसांनी अहवाल आल्यावर सतत शिंकणारी व खोकणारी पत्नी निगेटिव्ह होती. तर ते स्वतः पॉझिटिव्ह आले हे कसे काय? त्यांना धक्काच बसला होता. मात्र, डॉक्टरांकडेही याचे उत्तर नव्हते. अखेर 14 दिवस उपचार घेऊन ते घरी परतले आहेत. आपण कुणाच्याही संपर्कात आलो नव्हतो. पत्नी तर सोडाच मीही बाहेर पडलो नव्हतो. कुठेच डॉक्टर न मिळाल्याने सिव्हिलला गेलो अन् नसती शिक्षा पदरी पडली. अशी त्यांची भावना आहे. मात्र, त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देणारी एकही यंत्रणा सापडत नाही.
परवड आणि हेळसांड
या काळात अनेकांच्या पदरी फक्त हेळसांडच आली आहे. जनरल प्रॅक्टीशनर आणि तेही अपवादात्मक वगळता इतर अनेक डॉक्टरांनी पाठ फिरविली. मरणयातना होत असताना इस्पितळे कामी आली नाहीत. अतिशय धडधाकट व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात पटापट मरून गेल्य़ा. रोजचा मृत्यूचा आकडा वाढतोय. कोणी म्हणतंय बाधितांच्या संख्या वाढीमागे मोठा माफिया आहे. औषध कंपन्या, डॉक्टर्स आणि राजकीय लॉबी यामागे कार्यरत असल्याचे आरोपही होताहेत. अनेकांना आलेले अनुभव पाहता त्यांना वाटतेय ते खरे की काय? असा प्रश्नही गंभीर बनतोय. कोरोनाच नाही हे नाटक आहे असे म्हणणाऱयांपासून सारे काही थोतांड म्हणणाऱयांपर्यंत सर्वांनाच वाटतेय की जनतेच्या मरणयातनांचा कोणीच वाली नाही. अशा स्थितीत रोग आटोक्यात आणतानाच सामान्यांना जे वाटतेय ते गैरसमज असतील तर त्यांचे जाहीरपणे योग्य परिमार्जन होण्याची गरज आहे.
सरकारी अधिकारी, मंत्री-आमदार-खासदारांनाही कोरोना
सरकारी अधिकारी, मंत्री-आमदार-खासदारांनाही कोरोना होतोय. मात्र, ते सरकारी इस्पितळात दाखल होत नाहीत. यामुळे सामान्य वर्गात प्रचंड चिड आहे. त्यांनी खासगीत उपचार घेऊ नयेत हा मुद्दा नाहीच. मात्र हे लोक आमच्याबरोबर उपचार घेण्यास आले असते तर कदाचित आमचे त्रास कमी झाले असते, अशी भाबडी आशा त्यामध्ये आहे.