ऑनलाईन टीम / मुंबई :
शरद पवार एक महान नेते आहेत. त्यांनी राज्यात काडय़ा करण्यापलीकडे कोणतेही मोठे काम केलं नाही. जाईल तिथे आग लावायची आणि दुसरीकडे आग लावयला निघून जायचं. त्यांच्या आग लावण्यामुळे राज्य होरपळून निघाले आहे, आता त्यांनी थांबावे, अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.
सदाभाऊ खोत आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. तिथे सांगलीतील आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले, शरद पवारांचं उभं आयुष्य काडय़ा करण्यात आणि आग लावण्यात गेलं. त्यामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. त्यांनी आता थांबलं पाहिजे. तसेच त्यांनी पवार हे आडनाव बदलून आगलागे करावे.
सांगलीतल्या अहिल्यादेवी यांच्या स्मारकाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.