प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यात अलिकडच्या काही महिन्यामध्ये असे प्रकार दृष्टीक्षेपात आले आहेत ज्यामुळे सातारकरांच्या भूवया उंचावल्या आहेत. फलटण तालुक्यात एका गावातील स्मशानभूमीत मृतदेहाचे अवशेष खाताना एकजण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तर कास परिसरात उघडय़ावर जैविक कचरा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आता तर जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन रुममधील बेवारस मृतदेहाचे अवयवच भटक्या कुत्र्यांकडून गायब होत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला असून ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी गंभीर बाब असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना होणार काय ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात दररोज कोठे ना कोठे अपघात होत असतात. तर काही ठिकाणी बेवारस मृतदेह आढळून येत असतात. ते बेवारस मृतदेह जिल्हा रुग्णालयातील पोस्ट मार्टम रुममध्ये नातेवाईकांचा शोध घेईपर्यंत ठेवण्यात येतात. तर अपघातातील मृतांबरोबर इतर घटनांमधील मृतांचे पोस्ट मार्टमही त्या रुममध्ये करण्यात येते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पोस्ट मार्टम रुमच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. ही कुत्री या रुममधून बेवारस मृतदेहाचे अवयव लांबवत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली. त्यांनी ही बाब गंभीर असल्याचे स्पष्ट केले असून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी जिल्ह्यात उघडय़ावर जैविक कचरा आढळून आल्याचे निदर्शनास आले होते. कास पठार परिसरात जैविक कचरा आढळून आला होता तर लॉकडाऊनच्या काळात फलटण तालुक्यातही एका स्मशानभूमीत एक युवक मृतदेहाचे मांस खाताना आढळून आला होता. त्यास पुढे यशोधन ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु जिल्हा रुग्णालयातील पोस्ट मार्टम रुममधून बेवारस मृतदेहाचे अवयव गायब होण्यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.