पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी मोठा दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना नेहमी सत्याचाच विजय होतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. तसेच गेल्या साडेसात वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात योग्य न्याय मिळाल्याचा दावा करत आपल्यावरील आरोप आता निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे, असे थरूर यांनी म्हटले आहे.
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने बुधवारी निकाल जाहीर केला. न्यायालयाच्या निर्णयाअंती आरोप सिद्ध न झाल्याने शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाला अनेक वेळा स्थगिती दिल्यानंतर अखेर न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात शशी थरूर यांच्यावर आरोप निश्चित केले जावेत की नाही? या प्रश्नावर निर्णय देताना आरोप निश्चित करण्यास नकार दिला. पोलिसांनी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम 498 (क्रूरता) चे आरोप केले होते.
17 जानेवारी 2014 च्या रात्री सुनंदा पुष्कर दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूनंतर शशी थरूर यांच्यावर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. ते या प्रकरणातील मुख्य आरोपी होते आणि दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
सुनंदाचा मृत्यू विषाने झाल्याचा अहवाल
29 सप्टेंबर 2014 रोजी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी एम्स वैद्यकीय मंडळाने मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल दिल्ली पोलिसांना सुपूर्द केला. सुनंदाचा मृत्यू विषाने झाल्याचे या अहवालात म्हटले होते. शशी थरूर यांच्याबरोबरच सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचेही नाव पुढे आले होते. 2014 मध्येच सुनंदा पुष्करने मेहर तरारवर शशी थरूर यांना प्रेमाच्या जाळय़ात अडकवल्याचा आरोप केला होता.