महाविद्यालयातील पदवी अंतिम वर्षाचे वर्ग सुरू, महाविद्यालयाकडून गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने विद्यापीठ अधिविभाग व महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बुधवारी तब्बल पावनेदोन वर्षानंतर कॉलेज कट्टे फुलले. वर्ग संपल्यानंतर कट्टय़ावर बसून मित्र-मैत्रिणींनी गफ्पा मारण्याचा आनंद लुटला. त्याचबरोबर कॉलेज कँटीनही फुल्ल झाली होती. महाविद्यालयांनी गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
कोरोनाच्या नियमांचे पालन करीत 50 टक्के क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालये बुधवारपासून सुरू झाली. वर्गात आल्यानंतर ऑनलाईन शिक्षणापासून सुटका झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. प्राध्यापकांनीही गेल्या पावनेदोन वर्षात महाविद्यालय परिसरात चिटपाखरू फिरकत नसल्याने शांतात पसरली होती. आता विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसर फुलला असून, आम्हालाही प्रत्यक्ष ज्ञानादानाचा आनंद मिळत असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांशिवाय कोणत्याच शाळा, महाविद्यालयांना शोभा नसल्याच्याही भावना प्राध्यापकांकडून व्यक्त करण्यात आल्या. कॉलेजचे वर्ग, कार्यालय, कॉलेज परिसरात विद्यार्थींच्या उपस्थितीमुळे आनंदाचे वातावरण होते. तसेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत एका बँचवर एका विद्यार्थ्याला बसवण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे दोन डोस झालेत की नाही, याची खात्री करूनच वर्गात सोडण्यात आले.
प्रत्यक्ष शिक्षणाचा आनंदच वेगळा
ऑनलाईन शिक्षण घेत असताना नेटवर्क नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मित्र-मैत्रिणींपासून दूर असल्याने अभ्यासासंदर्भात चर्चाही बंद झाल्या होत्या. आज वर्गात प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेताना वेगळाच आनंद मिळत आहे. – वैष्णवी साळोखे (महावीर महाविद्यालय)
प्रत्यक्ष शिक्षणाबरोबर प्रॅक्टीकल करता येईल
एफ. वाय. बी. ए.चे निम्मे आणि एस. वाय. बी. ए.चे संपूर्ण वर्ष ऑनलाईन शिक्षण आणि प्रॅक्टीकल करण्यात गेले. आता प्रत्यक्ष कॉलेज सुरू झाल्याने शिक्षणाबरोबर प्रॅक्टीकलही करण्याचा आनंद मिळणार आहे. – कोमल भोसले (महावीर महाविद्यालय)
दिवाळीनंतर वसतिगृह सुरू होतील
पदवी अंतिम वर्षाचे वर्ग 50 टक्के क्षमतेने सुरू झाले आहेत. विद्यार्थी वर्गात आल्यानंतर त्यांना गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. वसतिगृह कधी सुरू करणार अशी विद्यार्थी व पलकांकडून विचारणा होत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. त्यानंतरच खऱया आर्थाने महाविद्यालये नियमित सुरू होतील. – डॉ. राजेंद्र लोखंडे (प्राचार्य, महावीर महाविद्यलय)
विद्यापीठ अधिविभाग अद्याप बंदच
शिवाजी विद्यापीठातील अधिविभागात शिक्षण घेणारे 85 टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात. त्यामुळे वसतिगृह सुरू झाल्याशिवाय अधिविभागात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत नाही. त्यामुळे शासन नियमानुसार अधिविभाग सुरू करण्यास परवानगी असली तरी वसतिगृह सुरू झाल्यानंतरच अधिविभाग सुरू होतील.