प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात घरोघरी उत्साहात व श्रद्धेने तुळशी विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या नियमांचे पालन आवश्यक असल्याने सोहळा साधेपणाने करावा लागला. मात्र कुटुंबीयांचा उत्साह कायम होता.
रंगरंगोटी करून तुळशी वृंदावन सजविण्यात आले. त्यामध्ये असणाऱया तुळशीच्या रोपाला हळदकुंकू, पुष्पहार, हिरव्या बांगडय़ा घालण्यात आल्या. प्रामुख्याने सायंकाळी श्रीकृष्णा समवेत विवाह लावण्यात आला. मणी मंगळसूत्र घालून जोडवी घालण्यात आली. तुळशी म्हणजे लक्ष्मी आणि श्रीकृष्ण म्हणजे विष्णू असे मानले जाते. त्यांच्या तत्त्वांच्या लहरींचा संयोग या दिवशी होतो, असे मानले जाते. तुळशीच्या रोपाबरोबरच आवळा आणि चिंच यांच्या फांद्याही रोवण्यात आल्या.
तुळशीचा विवाह झाल्यानंतर आरती करण्यात आली. त्याचवेळी घरातील तरुणींची आरती करून त्यांच्या डोक्मयावर अक्षता टाकण्यात आल्या. यामुळे घरात लवकरच विवाह समारंभ होतो, अशी श्रद्धा आहे. तुळशी विवाहानंतर चातुर्मासामध्ये जे व्रत घेतले असते किंवा जे पदार्थ वर्ज केलेले असतात त्या व्रताची सांगताही होते.
तुळशी विवाहानिमित्त बाजारपेठेत झेंडूच्या माळा, झेंडूची फुले, अन्य तऱहेची फुले, चिंचा, आवळय़ांच्या फांद्या व फळांची आवक वाढली होती. विद्युत रोषणाई केलेले तुळशी वृंदावन सायंकाळी उजळून निघाले होते.