शनिवार खूट, रिसालदार गल्ली येथील प्रकार
बेळगाव : महानगरपालिकेच्या पथदीप विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात दिवसाही पथदीपांचा लखलखाट सुरू आहे. यामुळे विजेचा अपव्यय होत आहे. शहरात एकीकडे पथदीप नसल्यामुळे नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे तर शनिवार खूट-रिसालदार गल्ली भागात दिवसाही पथदीप सुरू ठेवण्याचे प्रकार घडत आहेत.
रविवारी सकाळपासून शनिवार खूट येथील पथदीप सुरू होते. विनाकारण पथदीप सुरू ठेवल्याने नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत होती. शहरातील अनेक भागामध्ये पथदीप वेळेनुसार सुरू व बंद केले जात नसल्यामुळे दिवसा पथदीप सुरू तर रात्री बंद अशी स्थिती पहायला मिळत आहे. मनपाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हे प्रकार वाढीस लागल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.