प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काही सातारकर नागरिक शहरात ‘मास्क’ विना प्रवास करत आहेत. अशा 28 नागरिकांवर सातारा शहर पोलसांनी रविवारी कारवाई केली. ही कारवाई आज सोमवार दि. 7 रोजी सुरू राहणार आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. नागरिकांना वारंवार सुचना करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असतानाही काही नागरिक मनमानी कारभार करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने शहर पोलिसांनी शनिवारपासून कारवाईची मोहिम सुरू केली आहे. शनिवार 5 जणांवर मास्क न घातल्याने कारवाई केली. त्यांच्याकडून 2 हजार 500 रूपये दंड वसूल केला. तोच रविवार सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले होते. दुपार होईपर्यंत 20 जणांकडून मास्क न घातल्याने 500 रूपये दंड वसूल करण्यात आला. एकूण दिवसभरात 28 कारवाई झाल्या आहेत. एका दिवसात 14 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहिम आज सोमवार दि. 7 रोजीही सुरू राहणार आहे. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन सातारा शहरचे पोलीस ढेकळे यांनी केले आहे.