ठिकठिकाणी वाहतूक कोंडी : वाहनधारक हैराण, वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेशिस्त वाहनधारक, रस्त्यापेक्षा वाहने अधिक, रस्त्यावर सुरू असलेली विकासकामे आदी कारणांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनत आहे. मुख्य रस्त्याबरोबर शहरातील लहान रस्त्यांवरही वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी सोमवारी वाहनांची संख्या वाढली होती. त्यामुळे आरटीओ सर्कलपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. परिणामी शेजारील चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली आदी ठिकाणी वाहतुकीचा ताण वाढला होता. शिवाय वाहनधारकांना या गर्दीतून बाहेर पडताना नाहक त्रास सहन करावा लागला.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लहान-सहान गल्लीतून चारचाकी वाहने ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यातच रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय विकासकामांसाठी रस्त्यावरच दगड-माती टाकली जात असल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे. सण-उत्सव, मोर्चे, मंत्र्यांचे दौरे यामुळे वाहतुकीत बदल केला जात आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरदेखील वाहनांची संख्या दुपटीने वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न चिंतादायक बनला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.