विद्यार्थ्यांना दिलासा : काही गावांची वस्तीची बससेवा अद्याप ठप्पच; प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
शिवरायांच्या मूर्ती विटंबनेमुळे ठप्प झालेली बससेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. काही गावांची बससेवा वगळता सर्व मार्गावर बस धावत आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून परिवहनने ग्रामीण भागासह शहरी भागातील बससेवा सुरू केली आहे.
मागील दोन दिवसांपासून बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. मात्र, सोमवारी रात्रीपासून सर्व भागातील बससेवा पूर्ववत करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. बेळगाव तालुक्मयातील कुदेमनी, उचगाव, कल्लेहोळ, आंबेवाडी, मण्णीकेरी, केदनूर, हंदिगनूर, संतिबस्तवाड, रणकुंडये, कर्ले, बेळवट्टी, कावळेवाडी, बाकनूर, अतिवाड, राकसकोप, राजगोळी, मंडोळी, होनगा, काकती, मुचंडी, कणबर्गी आदी गावांची बससेवा पूर्ववत झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काही बसगाडय़ांवर दगडफेकदेखील झाली होती. खबरदारी म्हणून परिवहनने काही गावांची बससेवा बंद केली होती. मात्र, आता परिस्थिती निवळल्याने बसेस पुन्हा धावू लागल्या आहेत. मागील दोन दिवसांत बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची हेळसांड झाली. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला होता. बसपास असूनदेखील आर्थिक फटका बसला. मात्र, आता बससेवा सुरळीत झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
सातत्याने आंदोलन, दगडफेक, बंद यामुळे परिवहनच्या महसुलावरही परिणाम होत आहे. आधीच कोरोनामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहे. त्यातच बससेवा काही ना काही कारणास्तव ठप्प होत असल्याने परिवहनसमोर अडचणी वाढत आहेत. यंदा शैक्षणिक वर्षाला उशिराने प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांना बसपासदेखील उशिरा उपलब्ध झाले. मात्र, बससेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. अद्याप काही गावांची बससेवा सुरळीत आणि नियमित झाली नसल्याने विद्यार्थीवर्गाचे हाल होत आहेत. त्यामुळे बससेवा नियमित आणि सुरळीत करावी, अशी मागणी विद्यार्थीवर्गातून होत आहे.
वस्तीच्या बसदेखील पूर्ववत सुरू करा
शहरासह ग्रामीण भागातील ठप्प झालेली बससेवा मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंतच काही गावांच्या बस धावत आहेत. त्यामुळे रात्री उशिराने प्रवास करणाऱयांची गैरसोय होत आहे. अद्याप काही गावांच्या वस्तीच्या बस सुरू नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील वस्तीच्या बसदेखील पूर्ववत कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.