समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन-रहदारी पोलीस खाते सपशेल अपयशी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर आणि शहापूर भागातील पार्किंग समस्येची डोकेदुखी नेहमीचीच बनली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन आणि रहदारी पोलीस खाते सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता मुख्य रस्त्यांबरोबर गल्लीबोळांमध्ये देखील पार्किंग करण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. परिणामी आता गल्ल्याच पार्किंगतळ बनल्या आहेत. याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत आहे.
शहरात पार्किंग आणि नो-पार्किंग तसेच ऑड-ईव्हन पार्किंग संदर्भात महापालिका प्रशासनाने कोणतीच नियमावली केली नाही. परिणामी हव्या त्या ठिकाणी पार्किंग करण्यात येत आहे. बाजारपेठेतील पार्किंगची समस्या निवारणासाठी तसेच होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रहदारी खात्याने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोरोनाच्या लाटेमुळे शहरातील पार्किंगची शिस्त वाहून गेली आहे. परिणामी शहरात प्रत्येक रस्त्यांवर वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे.
समादेवी गल्लीतील रस्त्यावर भाजी विपेते आणि फेरीवाले ठाण मांडत असल्याने त्यांना हटविण्याचा प्रयत्न रहदारी पोलीस खात्याने केला होता. मात्र भाजी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱया नागरिकांनी व्यवसाय करण्यास मुभा देण्याची मागणी केली. त्यामुळे पार्किंगकरिता जागा सोडून तसेच रस्त्या काठावर मारण्यात आलेल्या पांढऱया पट्टय़ाच्या आत बसून भाजी विक्री करावी, अशी अट घालून परवानगी देण्यात आली. मात्र ही अट केवळ समादेवी गल्ली पुरतीच मर्यादित आहे. वास्तविक पाहता शहरातील व उपनगरांतील प्रत्येक रस्त्यावर भाजी विपेते, फेरीवाल्यांची गर्दी असते. तसेच दुचाकी वाहने पार्क करण्यात येतात. त्यामुळे रहदारी पोलीस प्रशासनाने अन्य रस्त्यांवरील अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
शहरात पार्किंगबाबत नियमावली घोषित करणे गरजेचे
रस्त्यावर थांबविण्यात येणाऱया वाहनांवर कारवाई करण्यासाठी रहदारी खात्याने विशेष वाहने तैनात केली आहेत. या वाहनांच्या तावडीत सापडल्यास 1600 रुपयाचा दंड भरावा लागतो. नियम डावलून रस्त्यावर वाहने पार्क करणाऱयांसाठी ही कारवाई योग्य आहे. पण सर्व ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करणेही गरजेचे आहे. बाजारपेठेत केवळ बाहेरून येणारे नागरिक वाहने पार्क करीत नाहीत तर व्यावसायिकांच्या दुकानात किंवा कार्यालयांमध्ये काम करणारे नोकरवर्ग देखील वाहने पार्क करतात. त्यामुळे रस्त्याशेजारी पार्किंगला जागाच शिल्लक नसते. बाजारपेठेत येणाऱया ग्राहकांना पार्किंगकरिता जागा शोधावी लागते. त्यामुळे शहरात पार्किंगबाबत नियमावली घोषित करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ऑड-ईव्हननुसार वाहने पार्क करणाऱयांना शिस्त लावणे गरजेचे आहे. पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
काही ठिकाणी ऑड-ईव्हन वाहने पार्क करण्याची मुभा आहे. पण रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे याला ब्रेक कोण लावणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. यापूर्वी बाजारपेठेत रहदारी पोलिसांची नियुक्ती करून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क करणाऱया वाहनधारकांना शिस्त लावण्यात येत होती. पण सध्या बाजारपेठेत काही मोजक्मयाच ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. कडोलकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्ली अशा विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. पण सदर रस्त्यांवर रुंदीकरण करण्यात आलेल्या जागेवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्किंगतळ बनले आहे. रस्त्याचे रुंदीकरण सुरळीत वाहतुकीसाठी नव्हे तर पार्किंग करण्यासाठी करण्यात आले का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
बाजारपेठेच्या सभोवती गल्ल्यांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क
बाजारपेठेत दुचाकी वाहने पार्क करण्यास जागा मिळत नसल्याने अन्य गल्ल्यांमध्ये जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी वाहने पार्क केली जातात. पण वाहने पार्क करताना रहदारी कोंडी होणार नाही, याचे भान देखील वाहनधारकांना नसते. दोन्ही बाजूंनी पार्क करण्यात आलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा होतो. बापट गल्ली, रिसालदार गल्ली, गेंधळी गल्ली, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, देशपांडे, अरळीकट्टी गल्ली, माळी गल्ली, खंजर गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली बसवाण गल्ली अशा बाजारपेठेच्या सभोवती असलेल्या गल्ल्यांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात येतात. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. तसेच व्यावसायिकांना देखील याचा फटका बसतो. काही रहिवाशांच्या दरवाजांसमोरच वाहने पार्क करण्यात येत असल्याने घरातून बाहेर पडताना अडथळय़ांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या समस्यांबाबत आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासन व रहदारी पोलीस खात्याने अशा ठिकाणी करण्यात येणाऱया पार्किंगसंदर्भात आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
शहराशी संलग्न असलेल्या शहापूर परिसरातदेखील पार्किंग आणि रहदारीची समस्या भेडसावत असते. कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर दुतर्फा वाहने पार्क करण्यात आल्याने पुलावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांना रहदारी कोंडीचा फटका बसतो. सध्या एसपीएम रोड आणि शहापूर खडेबाजार रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सदर कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे या भागात पार्किंगचा मोठय़ा प्रमाणात अडथळा होत आहे.
शहापूर खडेबाजार मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क करण्यात येतात. पण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने वाहने पार्क करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला वाहने पार्क करण्यात येत आहेत. या बाजारपेठेतदेखील नागरिकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असते. सराफी बाजारपेठ आणि कपडय़ांची दुकाने असल्याने खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या भागात देखील पार्किंगतळाची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. पण महापालिकेकडून कोणतीच उपाययोजना राबविण्यात आली नाही. परिणामी सध्या येथील गल्ल्याच पार्किंगतळ बनल्या आहेत. खडेबाजार मुख्य रस्त्याला जोडणाऱया प्रत्येक गल्लीच्या प्रवेशद्वारावर दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे अन्य वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी रस्ता मिळत नाही.
शहापूर बाजारपेठेकरिता पार्किंगतळ उपलब्ध करण्याची आवश्यकता
बसवाण गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, सराफ गल्ली, अळवाण गल्ली अशा विविध गल्ल्यांमध्ये वाहनांच्या रांगा लागत आहेत. रहिवाशांच्या घरासमोर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करण्यात आल्याने रहिवाशांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे शहापूर बाजारपेठेकरिता पार्किंगतळ उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. याकडे महापलिका प्रशासन लक्ष देईल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. तसेच येथील दुचाकी वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
बाजारपेठेत ऑड-ईव्हनप्रमाणे वाहने पार्क करण्यात येतात. पण फेरीवाल्यांना कोणतीच बंधने घालण्यात आली नाहीत. रस्त्याशेजारील पांढऱया पट्टय़ाच्या आतमध्ये वाहने पार्क करण्याची सूचना करण्यात येते. पण प्रत्येक रस्त्यावर हव्या तशा हातगाडय़ा लावून व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. भू-भाडय़ाच्या माध्यमातून महापालिका महसूल वसूल करते. पण रहदारीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी फेरीवाल्यांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. विशेषत: कडोलकर गल्ली, किर्लोस्कर रोड, हुतात्मा चौक, मारुती गल्ली, काकतीवेस, गणपत गल्ली अशा विविध ठिकाणी फेरीवाल्यांची गर्दी होत आहे. गणपत गल्लीत फेरीवाले दोन रांगेमध्ये हातगाडय़ा लावून व्यवसाय करतात. त्यामुळे पादचाऱयांना ये-जा करण्यासाठीही रस्ता मिळत नाही. अशातच प्रवासी रिक्षा रस्त्यावर थांबविण्यात येत असतात. प्रवाशांच्या शोधात प्रवासी रिक्षाधारक गणपत गल्लीमधून सावकाश वाहने चालवत असतात. दुसऱया वाहनांना पुढे जाण्यास रस्ता मिळत नाही. प्रवासी हात करताच त्याच ठिकाणी वाहन थांबवितात. त्यामुळे पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात.
मारुती गल्लीमध्ये पार्किंगच्या बाजूला प्रवासी रिक्षा थांबत असल्याने रिक्षा थांबा बनला आहे. त्याचप्रमाणे दुसऱया बाजूला चारचाकी वाहने थांबविण्यात येत असल्याने मारुती गल्लीसह विविध ठिकाणी नेहमी रहदारी कोंडी होत असते. त्यामुळे निर्माण होणाऱया समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.