प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर खडेबाजार रस्त्याचे काम अर्धवट झाले असून, अशातच रस्त्याशेजारी वाहने पार्क करण्यात येत आहेत. परिणामी शहापूर खडेबाजार रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांना अडकून पडण्याची वेळ आली आहे. याकडे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांसह रहदारी पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
कपिलेश्वर उड्डाणपूल ते बॅ. नाथ पै चौकपर्यंतच्या शहापूर खडेबाजार रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. मात्र, सदर रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्याशेजारी दुचाकी वाहने तसेच चार चाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. हा रस्ता महत्त्वाचा असल्याने शहराच्या दक्षिण भागातील नागरिक याच रस्त्याने बेळगाव बाजारपेठेत ये-जा करीत असतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. अशातच रस्त्याचे काम अर्धवट आणि रस्त्यावर करण्यात येत असलेल्या पार्किंगमुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. काँक्रिटीकरणामुळे रस्ता अरुंद बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सध्या पार्किंग करणे अयोग्य आहे. या रस्त्याच्या कामामुळे रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर हव्या त्या ठिकाणी पार्किंग करण्यात येत असल्याने रहदारीची कोंडी होत आहे. रहदारी कोंडी निर्माण होत असल्याने वाहनधारक अडकून पडत आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्याने चार चाकी वाहनांची वर्दळ थांबविण्यासाठी वाहतूक वळविण्याची गरज आहे. पण स्मार्ट सिटी कंपनीने कोणतेच नियोजन केले नसल्याने समस्या उद्भवत आहे. येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.