केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच अर्थ भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखालीच पक्षाची वाटचाल असणार, हे सूचित केले आहे.
कर्नाटकात सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर शेजारच्या केरळमध्ये निपाहचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मंगळूर, म्हैसूर, कोडगू, चामराजनगर या केरळच्या सीमेवरील जिल्हय़ात अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळहून कर्नाटकात येणाऱयांनी सध्या येऊ नये व येथून कोणी केरळला जाऊ नये, असे आवाहन सरकारने केले आहे. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे निपाहचा धोका असूनही केरळने नाईट कर्फ्यू रद्द केला आहे. त्यामुळे याचा धोका कर्नाटकाच्या सीमेवरील जिल्हय़ांना आहे. निपाहची लक्षणे असणाऱयांवर लक्ष ठेवण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे. नियमितपणे हात स्वच्छ धुवून घ्या. वटवाघुळे, डुकरांपासून दूर रहा. सर्दी, खोकला असणाऱयांपासून दूर रहा. मास्कचा वापर नियमितपणे करा, असे आवाहन करण्यात येत आहे.
कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. त्यामुळे आर्थिकतेला चालना मिळेल, असे निर्णय सरकारकडून घेतले जाणार अशी अपेक्षा होती. सरकारला काय करावे? याची कल्पना येईना, असे चित्र पहायला मिळते आहे. सरकारने गणेशोत्सवासाठी नवी मार्गसूची जारी केली आहे. यामध्ये केवळ पाच दिवसांच्या गणेशोत्सवाला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात बेळगाव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका घेताना कोरोनाचा विचार झाला नाही. कोरोनाचा फैलाव वाढतो आहे म्हणून निवडणुका टाळण्यात आल्या नाहीत. आता रुग्णसंख्या घटत असताना केवळ पाच दिवसांच्या गणेशोत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. बेळगाव वगळता इतर ठिकाणी कदाचित सरकारची ही मार्गसूची मान्यही करतील. बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. या परंपरेलाच छेद देण्याचे काम केले जात आहे. एकतर अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाला परवानगी द्या नाहीतर तुमचे तुम्हीच पाचव्या दिवशी विसर्जन करा, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
अलीकडे कोरोनाच्या नावाने जारी होणारे फतवे लक्षात घेता एकप्रकारे सरकारची मनमानी सुरू आहे, हे दिसून येते. कोरोना रुग्णसंख्या घटती आहे, असे सरकारच सांगते. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर कोणती खबरदारी घ्यावी, हे जाहीर करतानाच राजकीय सभा, समारंभ, बैठका, निवडणुका, प्रचार हे सुरूच आहे. राजकीय कार्यक्रमात कोरोनाचा फैलाव होत नाही, असा कदाचित सरकारचा गोड गैरसमज झाला असावा. काही जिल्हय़ातील विकेंड लॉकडाऊन हटविण्यात आला आहे. लॉकडाऊन, कर्फ्यूच्या नावे अधिकारीशाहीची जणू मनमानी सुरू आहे. आपल्याला हवे त्यांना रात्री उशिरापर्यंत उद्योग-धंदे, हॉटेल्स सुरू ठेवायला द्यायची व जे नको आहेत, त्यांना कोरोनाची नियमावली दाखवायची, असा सर्रास प्रकार पहायला मिळतो. आता हळूहळू लोक या फतव्यांना विरोध करू लागले आहेत. कारण पहिल्या लाटेत झालेले किटवाटप दुसऱया लाटेच्या वेळी झाले नाही. स्वतःचे अन्न स्वतःच कमवावे लागणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे जगण्यासाठीच्या धडपडीत सरकारच्या टुकार फतव्यांना किती महत्त्व द्यायचे, हे जनता ओळखू लागली आहे.
गेल्या आठवडय़ात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटकाच्या दौऱयावर आले होते. दावणगेरे येथील एका सभेत त्यांनी पुढच्या निवडणुका मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे. गणेशोत्सवानंतर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे राज्याच्या दौऱयावर निघणार होते. गेल्याच आठवडय़ात त्यांनी आपल्या या दौऱयाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत 125 ते 130 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणू, पक्षाकडे पुन्हा सत्ता खेचून आणण्यासाठी आपला हा दौरा आहे, असे येडियुराप्पा यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एखाद्या राज्याचे राज्यपालपद घेऊन निवांत रहा, असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यांना हा सल्ला मान्य नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा कर्नाटक दौरा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जर येडियुराप्पा यांचा दौरा सुरू झाला तर कर्नाटकाच्या राजकारणाचे शक्तीकेंद्र पुन्हा तेच असणार आहेत. त्यामुळे साहजिकच दोन सत्ताकेंदे निर्माण होणार आहेत. एकीकडे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि दुसरीकडे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा ही दोन सत्ताकेंदे तयार झाली तर भविष्यात पक्षाला त्याचा फटका बसणार आहे. याचा विचार करूनच येडियुराप्पा यांचा दौरा होऊ नये, असे प्रयत्न सुरू झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच अर्थ भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखालीच पक्षाची वाटचाल असणार, हे सूचित केले आहे. केवळ सव्वा महिन्याच्या कारकीर्दीत नूतन मुख्यमंत्र्यांनी आपला ठसा उमटवला आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर पक्षांतर्गत धूसफूस सुरू झाली आहे. काही जणांनी या वक्तव्याचे स्वागत केले आहे तर के. एस. ईश्वरप्पा यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्यांनी सामूहिक नेतृत्वावर भर देण्याचे जाहीर केले आहे. ठरल्याप्रमाणे येडियुराप्पा यांचा दौरा झालाच तर राज्य भाजपमध्ये दुफळी माजण्याची शक्मयताच अधिक आहे. कारण येडियुराप्पांकडे जबरदस्त संघटनशक्ती आहे. त्यांच्या सावलीतून अद्याप कार्यकर्ते दुरावलेले नाहीत. त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवणेही पक्षाला सध्या तरी परवडणारे नाही. बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणार, याचा अर्थ बी. एस. येडियुराप्पा व इतर तत्सम नेत्यांना बाजूला सारणार का? असा संशय सामान्य कार्यकर्त्यांच्या आणि येडियुराप्पा समर्थकांत निर्माण झाला आहे.