प्रतिनिधी / सांगली
रस्त्यासाठी शाळेच्या लहान मुलांचे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन अन् जिल्हाधिकाऱ्यांनी लहान मुलांची काळजी करत तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी पत्र देऊन रस्त्याबाबत तात्काळ आदेश दिले. स्वातंत्र्यानंतर आज पर्यंत गेली 40 वर्षे मागणी करूनही खंडेराजुरी- गांधीनगर हा रस्ता झाला नाही. तिन किमीच्या रस्त्यासाठी गांधीनगर येथील शाळेतील लहान मुले पालक सरपंच सहा नागरिकाने बुधवारी धरणे आंदोलन सुरू केले…. लहान मुलांच्या रस्त्याच्या मागणीसाठी केलेली मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मान्य करत संबंधित विभागास शुक्रवारी बैठक लावून रस्ता कामाबाबत लेखी आदेश दिले. सरपंच गजानन रूकडे, राष्ट्रविकास सेनेचे प्रशांत सदामते विनोद मोरे सह पालक व मुलानी बुधवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्याबाबत धरणे आंदोलन सुरू केले होते.
सुरुवातीला आंदोलनात लहान मुलांचा सहभाग असल्याने पोलीस प्रशासनाने मुलांना इथून तात्काळ पाठवा. यांना का आणले म्हणून दमबाजी करण्याचा प्रयत्न केला पण. लहान मुलांनी पोलीस मामा आम्हाला शाळेत जाण्यासाठी रस्ता पाहिजे…. अशी मागणी केली.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कार्यालयात प्रवेश करताना लहान मुले रस्त्याच्या मागणी बाबत घोषणा देताना पाहिले. त्यांनी तात्काळ आंदोलनकर्त्यांना बोलावून माहिती घेतली सरपंच गजानन रूकडे व विनोद मोरे त्यानी रस्त्याची परिस्थिती सांगितली पावसाळ्यात मुलांना शाळेत जाता येत नाही ,ओढ्यातून जावे लागते, एखादा वृद्ध किंवा गरोदर महिलेस दवाखान्यात नेता येत नाही या परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग ,मुख्यमंत्री सडक योजना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी आदेश देऊन शुक्रवारी सकाळी तात्काळ बैठकीचे नियोजन केले व तसे लेखी पत्रही दिले. तसेच शासन स्तरावर रस्त्यासाठी निधीसाठी प्रयत्न करू असे सांगितले व असे लहान मुलांना त्रास देऊ नका असेही सांगितले. खंडेराजुरी तील एक भाग म्हणजे गांधीनगर लोकसंख्या 700 ते 800, गावापासून अडीच ते तीन किलोमीटर लांब असणाऱ्या गांधीनगर मध्ये पहिली ते चौथी शाळा ,2 दूध डेअरी, मंदिरे ,शेकडो एकर द्राक्षबागा, ऊस शेती, भाजीपाला पिकवला जातो पण गांधीनगर मध्ये किंवा शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही पावसाळ्यात तर केविलवाणी अवस्था होते. ही गोष्ट विदर्भ-मराठवाडा ,बिहार मधील नाही तर विकास कामाचा आणणाऱ्या मिरज तालुक्यातील खंडेराजुरी जवळ असणाऱ्या गांधिनगर या वस्तीची आहे.
तेथील नागरिकांनी गेले चाळीस वर्षापासून आमदार-खासदारांचे,सत्ताधाऱ्यांचे रस्त्यासाठी उंबरे झिजवले . पण सातशे ते आठशे लोकवस्ती असणाऱ्या त्या नागरिकांची कोणालाही दया आली नाही. चाळीस वर्ष रस्ता मिळत नाही ही या लोकशाहीत दुर्दैवी गोष्ट आहे. हा रस्ता शासन दरबारी नोंद आहे. येथील कोणतेही नागरिकांची व शेतकऱ्यांची रस्ता कामात अडथळा नाही. कित्येक वर्ष रस्त्याची मागणी केली पण राजकिय इच्छाशक्ती नसल्याने हा रस्ताच होऊ शकला नाही.
बुधवार सकाळी लहान मुलांसह धरणे आंदोलन केल्यामुळे प्रशासनामध्ये त्याची तीव्रता वाढली होती रस्त्यावरून जाणारे येणारे लोक सुद्धा लहान मुले का बसल्यात असं विचारत.. पण मुलानी काका मला रस्ता पाहिजे… कलेक्टर साहेब आम्हाला रस्ता देणार का असे उत्तर देत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याबाबत तात्काळ लेखी आश्वासन व संबंधित विभागाची बैठक शुक्रवारी लावल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सरपंच रूकडे व मोरे यांनी सांगितले. त्यावेळी रंगराव पवार, राहुल कांबळे ,अमर चव्हाण, शितल चव्हाण, संभाजी चव्हाण, रवी हजारे, सागर चौगुले, खंडू मोरे, चारु चौगुले ,रायगोंडा पाटील, प्रकाश चौगुले ,पालक व लहान मुले उपस्थित होती.