प्रतिनिधी/ पणजी
दहावी – बारावीचे वर्ग सुरु करताना सरकारने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अन्यथा शाळा चालू करु नयेत असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संबंधित शाळा खुल्या करण्यास विरोध दर्शवला आहे. तसेच गोव्याला ‘कोळसा हब’ बनवू नका अशी मागणी देखील पक्षाने केली आहे.
पक्षाचे आमदार चर्चिल आलेमांव व गोवा प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दहावी – बारावीचे वर्ग सुरु केल्यास मुलांची जबाबदारी शाळा घेण्यास तयार नाहीत. ती जबाबदारी शाळा पालकांवर सोडत असून पालकांना जबाबदार धरणार आहेत. कोरोनाचे संकट चालू असून संपलेले नाही. अशावेळी मुलांची जबाबदारी न घेता शाळा चालू करणे मुलांसाठी – पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी धोकादायक आहे. आंधप्रदेशात शाळा चालू केल्यानंतर तेथे मुलांना – शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. तोच प्रकार गोव्यातही होऊ शकतो. मुलांची सुरक्षा महत्त्वाची असून दहावी – बरावी वर्ग सुरु करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोळसा प्रश्नी राष्ट्रवादी लोकांसोबत
कोळसा वाहतुकीस गोव्यातील लोक विरोध करीत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या लोकांसोबत आहे, अशी माहिती आलेमांव यांनी दिली. विविध प्रश्न – समस्या आणि त्यांचे महत्त्व तसेच जनतेचे म्हणणे या सर्वांची दखल घेऊन प्रत्येक विषयास अनुसरुन सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही ते ठरवतो, असे मत आलेमांव यांनी प्रकट केले. सर्वच विषयांना नकार देण्यात अर्थ नाही असेही ते म्हणाले. गोव्यात पर्यटन महत्त्वाचे असून कोळसा नाही. म्हणून गोवा पर्यटन हब करा, कोळसा हब करु नका, असा सल्ला आलेमांव यांनी दिला. कोळसा प्रश्नावर आपला पक्ष जनतेसोबत आहे, असेही आलेमांव यांनी स्पष्ट केले.