सावंतवाडी/प्रतिनिधी-
गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा सुरू करणे ही आज काळाची गरज बनली आहे. अन्यथा पिढ्या बरबाद होऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचा मुळ उद्देशच बाजूला पडले असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी केले असून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकासावर दिर्घकालीन परिणाम होईल अशी भीतीही व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासाठी पुर्व तयारी आणि नियोजन करुन शाळा सुरू करण्याचा निर्णय सर्वांनी एकत्र येऊन घ्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने अध्यक्ष वामन तर्फे व सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेले दिड वर्ष शाळा बंदच आहेत.गेल्या शैक्षणिक वर्षात काही काळ शाळा सुरू करण्यात आल्या परंतु दुसऱ्या लाटेमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.दहावी-बारावी बरोबरच इतरही वर्गांच्या परिक्षा न घेता पर्यायी व्यवस्था निर्माण करुन विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घालण्यात आले असे असले तरी विद्यार्थ्यांचा पाया कच्चाच राहीला, विद्यार्थ्यांच्या त्या-त्या वर्गातील क्षमता विकसित झालेल्या नाहीत.अशा परिस्थितीत मुलांना वरच्या वर्गात घालण्यात अर्थ काय?सद्य स्थितीत शाळा सुरू करण्यासंदर्भात विद्यार्थी, पालक,समाज, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांची मानसिकता निर्माण झाली आहे.