संसदीय समितीचा इशारा – स्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीमुळे शाळा बंद राहिल्याने शिक्षणाचे नुकसान होत आहे. गणित, विज्ञान आणि भाषेसंबंधी विषयांमध्ये मूलभुत ज्ञान कमजोर झाले असणार असे संसदेच्या एका समितीने नमूद केले आहे. शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडाविषयक संसदेच्या स्थायी समितीने स्वतःच्या एका अहवालात ही टिप्पणी केली आहे. शाळा सुरू न करण्याचे धोके अत्यंत गंभीर असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
एक वर्षापेक्षा अधिक काळापासून शिक्षणाचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे गणित, विज्ञान आणि भाषेसंबंधी विषयांमध्ये मूलभूत ज्ञान कमजोर झालेले असेल. शिक्षणाचे हे नुकसान मोठे असून यामुळे मुलांची ज्ञानसंबंधी क्षमता कमकुवत होऊ शकते. शाळा सुरू न झाल्याने समाजातील दुर्बल वर्गातील मुलांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. या मुलांना महामारीच्या काळात डिजिटल माध्यमाने शिक्षण घेता आले नसल्याचे समितीने म्हटले आहे.
मानसिक आरोग्याला धोका
शाळा बंद असल्याने मुलांचे शिक्षण, आहार, मानसिक आरोग्य आणि चौतर्फा विकासाला धोका निर्माण झाला आहे. काही विद्यार्थी विशेषकरून मुली बहुधा आता शाळेत परतू शकणार नसल्याची भीती आहे. शिक्षणाचे डिजिटल स्वरुप पाहता प्रत्येक शाळेला याच्यासाठी उपयुक्त केले जावे आणि याची व्याप्ती पूर्ण देशामध्ये वाढविण्यासाठी अतिरिक्त निधी पुरविण्यात यावा असे समितीने म्हटले आहे.
शाळा सुरू करण्यासंबंधी सूचना
सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱयांसाठी लसीकरणाला चालना देण्यात यावी, जेणेकरून शाळा लवकरात लवकर सुरू करता याव्यात. याचबरोबर शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी पर्यायी दिवसांमध्ये किंवा दोन सत्रांमध्ये वर्ग आयोजित करविले जाऊ शकतात. तसेच शारीरिक अंतर, फेस मास्क परिधान करणे अनिवार्य असावे. वारंवार हात धुण्यासारख्या कोविड नियमांचे पालन व्हावे. हजेरीवेळी नियमित स्वरुपात थर्मल स्क्रीनिंग आणि कुठलाही संक्रमित विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचाऱयाची त्वरित ओळख पटविणे आणि त्यांना आयसोलेट करण्यासाठी रँडम आरटी-पीसीआर टेस्ट करविली जाऊ शकते अशी सूचना समितीने केली आहे.