प्रतिनिधी / कराड :
कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र शासनाने पंढरपूर पायी वारीला बंदी घातली आहे. वारीचा आग्रह धरणारे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना करवडी येथे स्थानबद्ध केले आहे. शासनाच्या या कृत्याचा निषेध करत शिवप्रतिष्ठानच्यावतीने भिडे गुरूजींच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. वारीची परंपरा बंद करण्याचा शासनाचा निर्णय म्हणजे दुष्यासनाच्या कृत्यासारखा आहे. शासनाचा हा विरोध मोडीत काढून वारी होणारच. ज्या मार्गावरून वारी जाते, त्या मार्गावर ज्ञानोबाराय व तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम होणारच, असा इशारा भिडे गुरूजींनी कराड येथे दिला.
दरम्यान, बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करून शासनाने चूक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी बंडातात्यांना मुक्त करावे. अन्यथा याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशा इशारा भिडे गुरूजींनी दिला.
सोमवारी शिवप्रतिष्ठानसह वारकरी संप्रदायातील वारकरी यांनी भिडे गुरूजींच्या नेतृत्वाखाली कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन भिडे गुरूजींनी वारकरी व शिवप्रतिष्ठानच्यावतीने भुमिका मांडली.
निवेदन दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भिडे गुरूजी म्हणाले, वारी ही महाराष्ट्राची, देशाची परंपरा आहे. या परंपरेला खोडा घालण्याचे दृश्यकृत्य महाराष्ट्र शासनाने केले आहे. संतांची परंपरा मोडीत काढण्याचा हा डाव उधळून लावला पाहिजे. कारण समाज हे कुटूंब आहे. या कुटूंबाचे आई वडिल म्हणजे शासन आहे. आज आपण या शासनाच्या दारात आलो आहोत. शासनाने वारीला बंदी घातली ही फार मोठी अपराधाची गोष्ट केली आहे. वारीला बंदी म्हणजे हिंदूस्थानातील समाजाच्या श्वासोच्छ्वासाला बंदी आहे. महाराष्ट्र शासनाचे हे कृत्य नीच पातळीचे आहे. मात्र शासनाचा हा विरोध आपण मोडीत काढण्याची गरज आहे. सुर्याच्या किरणांना कोणी विरोध करू शकत नाही. तसेच वारीलाही कोणी विरोध करू शकत नाही असा इशारा भिडे गुरूजी यांनी शासनाला दिला.