विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दापोलीत आरोप
प्रतिनिधी/दापोली
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोकणाला दिलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. तुटपुंजी मदत देऊन शासनाने कोकणाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ही मदत उभारी देण्यासाठी काही कामाची नाही. याकरिता शासनाने कोकणाला वाढीव मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना केली.
ते पुढे म्हणाले की. सर्वात जास्त नुकसान रत्नागिरी जिह्याचे झालेले आहे. यामुळे शासनाने रत्नागिरी जिह्याकरिता भरभरून मदत देणे फार गरजेचे होते. मात्र रायगड जिह्याकरिता 100 कोटी, रत्नागिरीकरिता 75 कोटी, सिंधुदुर्ग जिह्याकरिता 25 कोटी मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत नुकसान पाहिल्यास अत्यंत तुटपुंजी आहे. ही मदत कोकणाच्या दाढेलादेखील पुरणार नाही. या वादळामध्ये संपूर्ण कोकण उद्ध्वस्त झालेला आहे. अनेकांची पूर्ण घरे जमीनदोस्त झालेली आहेत. त्यांना केवळ 95 हजार रुपये देऊन चालणार नाही. हे जुने निकष बदलून नुकसान झालेल्याना निकषाच्या तीनपट रक्कम मिळावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच ज्यांची घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत त्यांना सरसकट तीन लाख रुपये शासनाने द्यावेत. पंतप्रधान आवासमध्ये या घरांचा अंतर्भाव करावा असेही ते म्हणाले.
जनजीवन सुरळीत करण्यासाठी जी मदत लागेल ती आपण करणार आहोत. जर शासन कुठे कमी पडत असेल तर आपण शासनाला तसे ठासून सांगू. मात्र कमीत कमी दिवसांमध्ये कोकणातील जनजीवन सुरळीत होणे फार गरजेचे आहे. कोल्हापूरच्या धर्तीवर कोकणाला मदत होणे गरजेचे आहे. ज्यांचे झाडांचे नुकसान झालेले आहे ती झाडे भविष्यात मालकाला किती उत्पन्न देणार होती याचे मोजमाप करून प्रत्येक झाडाचे नुकसान झाडाच्या मालकांना मिळणे गरजेचे आहे. आपण फक्त अर्ध्या तासाचा दौरा करून दिखावा करण्यासाठी इथे आलेलो नाही. आपल्यासोबत आलेले आमदार प्रत्येक तालुक्यामध्ये यापुढे ठाण मांडून बसणार आहेत. प्रत्येक दिवसाचा कामाचा आढावा आपण घेणार आहोत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येथे सेवाकार्य मोठय़ाप्रमाणात सुरू होणार आहे. पत्रे, कौले, कोने, धनधान्य, दिवे दोन दिवसात दापोली व मंडणगडमध्ये पोहोचतील. ते कार्यकर्त्यांमार्फत आपद्ग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येणार आहे. रायगड जिह्यामध्ये जी आपत्ती आली तेथे सर्वप्रथम विरोधी पक्षनेता म्हणून आपण पोहचलो. यानंतर मुख्यमंत्र्यांना तेथे पोहचावे लागले. रायगडपेक्षा रत्नागिरीमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. केवळ केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, माजी आमदार विनय नातू, माधव भंडारी यांच्यासह केदार साठे, तालुकाप्रमुख मकरंद म्हादलेकर, श्रीराम इदाते, स्मिता जावकर, उदय जावकर, जया साळवी, इकबाल परकार आदी उपस्थित होते.