पाठिंब्यासाठी जिल्ह्यातून पूर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कर्जमाफी, लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल माफी, अवकाळी नुकसान भारपाईत सरकारने खोटे जीआर काढून शेतकर्यांना फसवले आहे. असा आरोप शाहू समुहाचे प्रमुख समरजीत घाटगे यांनी केला. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करुन शेतकर्यांना दिलासा द्या, अन्यथा राजर्षी शाहूंचे नाव घ्याल, तर याद राखा असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला. शाहू समुहाचे प्रमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ बुधवारी उपोषण केले. उपोषण सांगता प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्नी नवोदिताराजे, बंधू वीरेंद्रराजे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकर्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन
रयतेचा सेवक म्हणून आंदोलन करत आहे. माझे आंदोलन सर्वसामान्य जनता शेतकर्यांसाठी आहे. मी कुणाल विरोध करावा, राजकारण करावे, म्हणून उपोषण करत नाही. शेतकर्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, ही माझी प्रामाणिक भावना आहे. पण काही मंडळी या आंदोलनाला राजकिय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. योग्य वेळी त्यांना उत्तर देऊच, पण शेतकर्यांच्या प्रश्नात राजकारण करुन त्यांना काय संदेश द्यायचा आहे, हेच मला समजत नाही. पण आज दिवसभर दसरा चौकात पाठिंबा देण्यासाठी झालेल्या गर्दीने त्या प्रवृत्तीला चोख प्रतिउत्तर दिलेले आहे. अशा शब्दात समरजीत घाटगे यांनी विरोधकांना फटकारले.
आंदोलनस्थळाला शेतकर्यांचा गराडा
आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दसरा चौकात शेतकर्यांनी एकच गर्दी केली होती. मिळेल त्या वाहनाने शेतकर्यांचे जथ्थेच्या जथ्थे दसरा चौकात दाखल होत होते. पाठिंबा देणार्या प्रमुखांमध्ये बाबासाहेब पाटील, राहूल देसाई, महावीर गाठ, माजी महापौर सुनील कदम, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, वैभव माने, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर, अजिंक्य इंगवले, जय शिवराय किसान मोर्चाचे संस्थापक शिवाजीराव माने, अनिता चौगुले, शाहू कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक बॉबी माने, डी. एस. पाटील, सचिन मगदूम, गोपाल पाटील, युवराज पाटील, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, नंदू माळकर, बिद्री कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुनीलराज सूर्यवंशी, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रवीण गुरव, पप्पू कुंभार, विवेक कुलकर्णी, भाजपचे नाथाजी पाटील, यांच्यासह विविध संस्था, संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
धाडस असेल तर थेट बोला – ग्रामविकास मंत्र्यांना दिले आव्हान
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता सडकून टिका केली. धाडस असेल तर थेट बोला, असे जाहीर आव्हान त्यांनी केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी काढलेल्या पत्रकाचा त्यांनी तिखट शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, माझ्या उपोषणा विरोधात काढलेल्या पत्रकाची क्रिप्ट कागलमध्ये तयार झाली. जिल्हाध्यक्षांनी फक्त सही केली आहे. कारण माझ्याशी थेट बोलण्याचे धाडस त्यांच्यात नाही. म्हणून दुसर्याच्या नावाने पत्रक काढले आहे. अशी टिका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली.
अजित जमादार यांचे 25 किलोमीटर दंडवत
कडगाव येथील अजित जमदार यांनी उपोषण स्थळ, भवानी माता मंदिर, अंबाबाई मंदिर, ते जोतिबा मंदिर असे 25 किलोमीटर दंडवत घालण्यास सकाळी 10 वाजता दसरा चौकातून सुरवात केली. यावेळी त्यांना थंड पाण्याने अंघोळ घालून शुभेच्छा दिल्या. त्यांनी या माध्यमातून शेतकर्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या संघटनांचाही आंदोलनात सहभाग
आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समिती, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, जय शिवराय किसान संघटना, यशवंत सेना, कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा संघ मंडळ, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल, धनंजय महाडिक युवाशक्ती, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना कसबा बीड, लोकमान्य समुह मडिलगे, ब्लॅक पँथर पक्ष, विविध ग्रामपंचायती, सेवा संस्था, दूध संस्था संघटना.