परिसरातील पाण्याच्या टाकीची दूरवस्था, दगडी बांधकामाची पडझड, प्रेमी युगुलांचा वावर, मद्याच्या बाटल्यांचा खच
भीमराव पाटील/नावली
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असणार्या मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या ‘चहाची मळी’ परिसराची सध्या दुरवस्था झाली असून या शाहूकालीन परिसराचे संवर्धन करण्याची मागणी शाहूप्रेमीतून होत आहे.
किल्ले पन्हाळगडापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक मसाई पठाराच्या पायथ्याशी असणाऱया जंगल परिसरात शाहूराजांनी चहाची यशस्वी लागवड केली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. जनतेच्या कल्याणासाठी आपल्या संस्थानात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. अनेक उपक्रम राबवले. अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. राजर्षी शाहू महाराजांनी अनेक देश-विदेश दौरे करताना त्या परिसरातून आपल्या राज्यात नवे काय आणता येईल याचा सदैव विचार केला. यातूनच पूर्वोत्तर राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना आसाम सारखे चहाचे मळे आपल्या राज्यातही असावेत असे वाटले यातूनच त्यांनी दौऱयावरून परतताच चहाच्या लागवडीसाठी जागेची शोधाशोध सुरू केली. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पन्हाळा परिसरात त्यांनी मसाई पठाराच्या पायथ्याशी जागा निवडून तिथे चहाची यशस्वी लागवड करून दाखवली. चहा लागवडीसाठी लागणारे पोषक वातावरण या परिसरात असल्याने येथील चहा लागवड कमालीची यशस्वी झाली.
मसाई पठार परिसरातील म्हाळुंगे गावच्या पायथ्याशी असणाऱया जंगल परिसरात राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी चहाची लागवड करताना आजूबाजूच्या लोकांना काम मिळेल याची दक्षता तर घेतलीच शिवाय वन्य प्राण्यांनाही फारसा त्रास होणार नाही अशा जागेची निवड केली. यासाठी त्यांनी म्हाळुंगे येथून बिडाचे नळ वापरून सायफन पद्धतीने पाणी आणले आजही या परिसरात पाण्याच्या टाक्या तसेच दगडी बांधकाम असलेले वाफे रस्त्याच्या दुतर्फा देशी झाडांची लागवड केलेली पहावयास मिळते. इथे पिकलेला चहा राजर्षी शाहू महाराजांनी संस्थानात तर वापरलाच शिल्लक राहिलेला चहा इंग्लंडला ‘पन्हाळा फोर्ट टी’ या नावाने निर्यात केल्याच्या नोंदी बाम्बे तसेच कोल्हापूर गॅझेटमध्ये आढळतात. सतत नावीन्याचा ध्यास घेतलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी चहाच्या मळ्याच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आजही पक्के बांधकाम असलेल्या पाण्याचे हौद आणि चहाची लागवड करण्यासाठी बांधलेले पक्के बांधकाम असलेल्या भिंती असलेले वाफे आपले अस्तित्व टिकवून आहेत तसेच दगडी बांधकाम असलेले तयार वाफे आपणास आजही या परिसरात पहावयास मिळतात.
स्वातंत्र्यानंतर मात्र हा परिसर वनविभागाच्या ताब्यात गेला तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या मृत्यू नंतर कालांतराने चहाचे मळे कमी होत गेले आणि वनविभागाने या परिसरात देशी-विदेशी वृक्षांची लागवड केली. आज या परिसरात निलगिरी, काजू, तसेच ऑस्ट्रेलियन बाभूळ यासारखी वठवलेली झाडे पहावयास मिळतात. सध्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली असून दगडी बांधकामाची काही ठिकाणी पडझड झालेली आहे. मसाई पठारावर पर्यटनास येणारे काही मद्यधुंद पर्यटक या ठिकाणी ओल्या पाटर्या करतात. तसेच प्रेमीयुगुलांचे चाळे, मद्यांचा बाटल्यांचा खच या परिसरात आढळून येतो. वनविभागाने या परिसरात व्हर्टिकल ऍडवेंचर पार्क या नावाने साहसी पर्यटनाचा अनोखा प्रकल्प उभारला असून या ठिकाणाला पर्यटक मोठी संख्येने भेट देत आहेत त्यामुळे या परिसरात तसेच मसाई पठारावर सध्या पर्यटकांचा वावर वाढला आहे. या परिसरात वनविभागाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावे एखादा प्रकल्प उभा केल्यास तसेच या परिसराचे संवर्धन केल्यास राजर्षी शाहू राजांच्या दूरदृष्टीचे प्रतिक असलेल्या ‘चहाची मळी’ चे अस्तित्व चिरंतन राहील यात शंका नाही.
दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड करून या परिसराचे संवर्धन करण्याची गरज आहे.तसेच किल्ले पन्हाळगडापासून जवळच असलेल्या या परिसरात वनविभागाच्यावतीने वनपर्यटनाशी संबंधित एखादा उपक्रम राबवल्यास मसाई पठारावर येणाऱया पर्यटकांना लाभ होईल.
-दत्तात्रय बोबडे, वनव्यवस्थापन समिती, जेऊर