प्रतिनिधी / बेळगाव
पाण्याच्या गळतीकडे पाणीपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सातत्याने घडणाऱया पाणी गळतीच्या समस्येमुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. शाहूनगर येथील जोशी कॉलनी येथे मागील वर्षभरापासून जलवाहिनीला गळती लागली असून ही गळती निवारण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांकडून सातत्याने याबाबतच्या तक्रारी करूनही दुरुस्ती करण्यात आली नसून प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
शाहूनगर येथील जोशी मळा भागातील जलवाहिनीला गळती लागली असून वर्षभरापासून सदर परिस्थिती जैसे थे आहे. याबाबत येथील नागरिकांनी पाणी पुरवठा मंडळ तसेच मनपा प्रशासनाला सांगूनही निवारण करण्यात आले नाही.
निवारण करू, असे आश्वासन देण्याबरोबरच तात्पुरत्या स्वरुपात गळतीद्वारे वाया जाणारे पाणी गटारीला जोडण्यात आले. यामुळे हजारो लीटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा मंडळाकडून पाणी वितरणाची जबाबदारी पार पाडली
जाते.
मात्र, अशाप्रकारे पाणी वितरण होताच पिण्यायोग्य पाण्याची नासाडी झाल्यास पुढे भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. यामुळे पाणी पुरवठा करण्याबरोबरच ठिकठिकाणी लागणाऱया गळत्यांची दुरुस्ती करून वाया जाणारे पाणी वाचवावे, असे मत व्यक्त होत आहे.