ओटवणे /प्रतिनिधी-
सरमळेत अतिदुर्गमस्थानी असलेल्या धनगर बांधवांच्या शितपवाडी रस्त्याचे काम नियोजित आराखड्याप्रमाणे न झाल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यात भर रस्त्यावर दरड कोसळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला असुन याचा फटका शितपवाडीवासियांना बसतआहे.
बांदा – दाणोली या जिल्हामार्गादरम्यान बावळाटं येथून शितपवाडीकडे जाणाऱ्या या सात किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र पावसाळ्यात गेली दोन वर्षे भर रस्त्यावर दरड कोसळून या शितपवाडीच्या धनगर बांधवांचा संपर्क तुटतो. संबंधित अधिकाऱ्यासह ठेकेदारही यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने या धनगर बांधवांना भर पावसात कोणीच वाली नसतो.
डोंगरमाथ्यावरील या रस्त्यावर दरड न कोसळण्याच्या कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत संबंधित खात्याचे अनेकवेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्यानेच या धनगर बांधवांना दरवर्षी या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संबधित खात्याच्या अधिकाऱ्यासह ठेकेदाराने याची तात्काळ दखल घेऊन भर रस्त्यावर कोसळलेली ही दरड दूर करून गैरसोय दुर करावी अशी शितपवाडीवासीयांची मागणी आहे.