खानापूर / प्रतिनिधी
लेंढा-शिवठाणनजीक रेल्वे रुळ ओलांडताना एका गवीरेडय़ाला मालगाडीची धडक बसल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. विशेष तो गवा मादी होती. व गरोदरही होती. त्यामुळे तिच्या पोटातील गव्याचे पिल्लूही मृत अवस्थेत पोटाबाहेर पडले होते. या घटनेची लोंढा वनविभागाच्या वनाधिकाऱयांना माहिती मिळताच वनाधिकारी प्रशांत गौराणी व त्यांच्या सहकार्यानी तातडीने घटनास्थळी जावून पाहणी केली. यानंतरच पशु वैद्याधिकारी मनोहरी दादनी यांना बोलावून मृत गवा व त्यांच्या पिल्ल्लाची उतरीय तपासणी करण्यात आली. व यानंतर जागेवरच त्या गव्याचा व पिल्लाचा अत्यंविधी उरकण्यात आला.
खानापूर तालुक्यात गुंजीपासून अळणावरपर्यंत जाणाऱया रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला बऱयाच ठिकाणी जंगल प्रदेश आहे. या जंगलात गवीरेडे तसेच इतर वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. गवीरेडे पाणी व चाऱयासाठी या जंगलातून त्या जंगलात जाताना त्यांना रेल्वेलाईन ओलांडावी लागते. अशावेळी अनेकवेळा रेल्वेची धडक बसून गवीरेडे ठार होण्याच्या घटना गेल्या तीनवर्षात बऱयाच प्रमाणात वाढल्या आहेत. गवीरेडय़ाबरोबरच इतरही लहान मोठे वन्य प्राणीही रेल्वेच्या धडकेने ठार होण्याच्या घटना नेहमी घडतात. या मार्गावर रेल्वेच्या धडकेने दोन हत्ती देखील दगावल्याच्या घटना घडल्या होत्या. आता तर या मार्गावर दुहेरी रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यातच हुबळी-लोंढा-मिरज मार्गाचे विद्युतीकरणही सुरु आहे. यामुळे या पुढील काळात दुहेरी मार्ग झाल्यावर रेल्वे धावण्याची संख्या वाढणार आहे. तसेच विद्युतीकरणामुळे रेल्वेचा वेगही अधिक राहणार आहे. अशावेळी वन्य प्राणी रेल्वे मार्ग ओलांडताना अपघातांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. याकरिता दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरु असतानाच वनखात्यानेही रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला तारेचे कुंपण घालून वन्य प्राणी रेल्वे मार्गावर पोहचू शकणार नाहीत, याची दक्षता घेण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे. या जंगलात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जागाही ठरलेल्या असतात. पाण्यासाठी देखील त्यांना असा जागांवर जाताना रेल्वे लाईन ओलांडावी लागते. अशा ठिकाणी प्राणी जाण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था झाल्यास वन्य प्राणी रेल्वे लाईनवर न जाता त्या भुयारी मार्गाने पाण्याच्या ठिकाणी पोहचू शकतील, याचा देखील रेल्वे वनखात्याने संयुक्तरित्या विचार करणे गरजेचे आहे.