सातारा शहरात बॅनर मुक्तीचा उठतोय आवाज ; पालिकेत केला होता ठराव
सातारा / प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसामध्ये वातावरणात सतत बदल होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी सातारा शहरात शिवतीर्थ येथे जोराच्या आलेल्या वाऱयाने बॅनर पडला. त्यात पायी चालत निघालेल्या कविता बबन मोरे या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर शहरात बॅनरमुक्तीच्या आवाजाची गुंज उठू लागली आहे. शिवतीर्थ परिसरात बॅनर नको यासाठी ‘तरुण भारत’च्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. त्या नुसार पालिकेने तसा ठराव केला होता.
सातारा शहरात शिवतीर्थ या ठिकाणाला अनन्य साधारण महत्व आहे. या परिसरात मंगळवारी दुपारी आलेल्या वाऱयाने बॅनर पडला. त्याच बॅनरखाली सापडून पायी चालत निघालेल्या लक्ष्मी टेकडी येथील कविता मोरे या जखमी झाल्या असून वाऱयाचा वेग एवढा प्रचंड होता की पोलीस चौकीचे खोके पडले. दरम्यान नागरिकांनी तत्काळ त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या आठ दिवसापासून वातावरणात बदल झालेला असून अचानक पाऊस होतो, गारठा वाढतो, वारे वेगाने वाहते त्याचाच प्रकार मंगळवारी सातारा शहरात सुरू होता. त्या वाऱयामुळे शिवतीर्थ परिसरातील फ्लेक्स पडला तसेच पोलीस चौकी ही कोलमडून पडल्याचे सातारकर नागरिकांनी पाहिले.
बॅनरमुक्तीचा उठू लागला आवाज
शहरात बॅनरच्या दुर्घटना यापूर्वी काही वर्षांपूर्वी सोमवार पेठेत घडली होती. लागलेल्या बॅनरबाबत महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या प्रतिभा शेलार, सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे यांनी पालिकेने जाहीर केलेले पत्रक सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल करून सातारकराना आठवण करून दिली. त्याचबरोबर शहर सुधार समितीला तर निमितच लागते. शहरात कुठे काय घडतय आणि आम्ही लगेच पत्रक मीडियाला आणि निवेदन प्रशासनाला देतोय याच्याच प्रतीक्षेत असतात. आज ही त्यांनी पत्रक मीडियापर्यंत पोहचते केले आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा बॅनर मुक्तीचा आवाज उठू लागला आहे.
‘तरुण भारत’चा शिवतीर्थ बॅनर मुक्तीसाठी पाठपुरावा
शहरातील शिवतीर्थ हे बॅनर मुक्त व्हावे, यासाठी ‘तरुण भारत’ने अनेकदा लेखन करून पालिकेच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. पालिकेच्या सभेत बॅनर मुक्तीचा ठराव करण्यात आला, त्याची अंमलबजावणी करणारे पत्र ही पालिकेने जारी केले होते. प्रशासनाने किती ही नियम बनवले तरी आम्हीच नियम मोडणार, आमचे कोणी काही करू शकत नाही, या भूमिकेत काही कार्यकर्ते असतात. त्यांनी पुन्हा शिवतीर्थ परिसरात बॅनर लावण्यास फेब्रुवारी महिन्यापासून प्रारंभ केला. त्यावेळी चक्क एका अधिकाऱयाने ऑफ दि रेकॉर्ड बॅनर मुक्तिबाबत स्पष्टपणे मीडियाच्या प्रतिनिधीकडे विचार मांडले होते.