वार्ताहर / उचगांव
राज्य शासनाच्या उपक्रमाद्वारे गोरगरिबांना केवळ पाच रुपयांमध्ये शिवभोजन थाळी दिली जाते. दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या श्रमिकांना शिवभोजन थाळी आधारवड ठरत आहे.
गांधीनगरमधील वळिवडे कॉर्नर येथे करवीर तालुक्यातील पहिल्या शिवभोजन थाळीच्या उपक्रमाचा प्रारंभ कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीरच्या तहसिलदार शितल मुळे-भांबरे होत्या.
गांधीनगर शिवभोजन थाळीच्या व्यवस्थापिका सारिका शेळके यांनी स्वागत केले. कृष्णात शेळके यांनी प्रास्ताविकात सर्वांना चांगली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सांगितले. कोल्हापूर दक्षिणचे ग्रामीण संपर्कप्रमुख बजरंग रणदिवे, पंचायत समिती सदस्य प्रदीप झांबरे, राजगोंडा वळीवडे, प्रल्हाद शिरोटे, चंद्रकांत पाटील, डॉ अरविंद मोहिते, मंडलाधिकारी अर्चना गुळवणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.