प्रतिनिधी/कोल्हापूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या राजकीय पक्षाच्या झेंडय़ावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे. राजमुद्रा वापरल्यामुळे निवडणुक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे तर पोलीसात तक्रार केली आहे.मनसेने झेंडय़ावरील राजमुदा रद्द करावी अन्यथा त्यांना संभाजी ब्रिगेड माफ करणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
श्रीमंत कोकाटे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी राजमुद्रा दिली.प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची लोककल्याणकारी राजमुदा सतत तळपत राहणारी आहे. ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचे महत्वपूर्ण प्रतीक ऐतिहासिक ठेवा आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने या राजमुद्रेचा वापर करणे हा शिवाजी महाराजांचा अवमान आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी त्यांच्या झेंडयावर राजमुद्रा वापरली आहे. त्यांच्या या भूमिकेला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. राज ठाकरे यांनी जेम्स लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकरांना मदत केली आहे. ठाकरे यांच्या भूमिका शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱया आहेत. त्यामुळे त्यांनीच काय कोणत्याही राजकीय पक्षाने भूमिकेसाठी मुद्रेचा वापर करु नये.मनसेच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.तसेच पोलीसात तक्रार दिली आहे.निवडणूक आयोगाकडून उत्तर येण्याची प्रतीक्षा आहे.त्यानंतर झेंडय़ावरील राजमुद्रा रद्द केली नाही तर संभाजी ब्रिगेड,शिवप्रेमी जनता त्यांना माफ करणार नाही असा इशारा दिला. पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे हिंदूराव पाटील,बाबा महाडिक,अनिल म्हमाने,प्रवीण पाटील,संदीप भोसले,सुधाकर पाटील उपस्थित होते.
देशाची वाटचाल अराजकतेकडे-
श्रीमंत कोकाटे म्हणाले,देशाची वाटचाल सद्या अराजकतेकडे सुरु आहे.देशातील स्वयत्तः संस्था धोक्यात आहेत.जगातील सर्वात मोठे असलेले अमेझॉनची जंगल ज्यांनी जाळले आणि एका ब्राझीलच्या एका महिला खासदारावर अश्लाघ्य भाषेत टिपणी केली, ते ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सेनारो हे आजच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे आहेत.ही बाब भारताची प्रतिमा जगात मलिन करणारी आहे.यामुळे मोदी सरकारचा निषेध करत आहे.