प्रतिनिधी/ सातारा
गेल्या काही दिवसांपासून साताऱयाच्या राजवाडा बसस्थानकावर सुरु असलेल्या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास स्वामी यांच्यावरील उभारण्यात येत असलेल्या शिल्पाबाबत डाव्या विचारांच्या संघटनांकडून विरोध होवू लागला. त्यांनी रामदास स्वामी यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध नाही, असा आरोप केला होता. त्यावरुन आज विविध संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचे पुरावेच जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना सादर केले आणि शिल्पाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले.
समर्थ रामदास स्वामी यांचे रहिवास असलेले ठिकाण म्हणजे सज्जनगड, चाफळ आदी ठिकाणे आजही आहेत. आज जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय हिंदू महासभा, सज्जनगड येथील रामदासी, भाजपा, शिवसेना, नारी शक्ती फौंडेशन सातारा यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये नगरसेवक विजय काटवटे, भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, भाजपाचे नगरसेवक सुनील काळेकर, गणेश मेळवणे, निलेश शहा, ऍड. प्रशांत खामकर, नारी शक्ती फौंडेशनच्या सुनेशा शहा, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, शिवसेनेचे शहरप्रमुख निमिष शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निवेदन देण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना स्वामी म्हणाले, शासनाच्या माध्यमातून साताऱयाच्या राजवाडा परिसरात एक शिल्प उभे केले जात आहे. त्या स्मारकाला काही समाजघटकांकडून विरोध केला जात आहे. इतिहास खोटा आहे असे ते बोलतात परंतु शिवसमर्थांचा इतिहास खरा आहे. साडेतीनशे वर्षापासून आपल्याकडे पुरावे आहेत. शिवसमर्थ योग हा ग्रंथ सज्जनगडावरुन काढण्यात आला आहे. त्या ग्रंथात 50 पत्र आहेत. महाराष्ट्रातील इतिहासकारांचे लेख आहेत. ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी तो ग्रंथ वाचावा, विनाकारण आक्षेप घेणे हे चांगल्या बुद्धीचे लक्षण नव्हे. त्याकरता व्यवस्थित अभ्यास करावा. मग चिंतन करावं. त्यानंतर विषय मांडावा. एखाद्या घटकाचा, एखाद्या समाजाचा विनाकारण विरोध करायचा म्हणून चांगल्या गोष्टीला विरोध करणं हे चांगलं लक्षण नाही. विरोध योग्य नाही. शासनाच्या माध्यमातून होणार स्मारक योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि समर्थाची कर्मभूमी म्हणून सातारा पाहिलं जात. जगभर प्रसिद्ध आहे. भारतात प्रसिद्ध आहे. या शिल्पाला जो विरोध होतोय त्याचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. तसेच ऍड. सौरभ देशपांडे, विकास गोसावी आदींनी आपली मते व्यक्त केली.